एकूण पृष्ठदृश्ये

नमस्कार आपलं या वेबसाईटवर स्वागत आहे

२५ मे २०२३

माणूस असण्याच्या नोंदी : व्यवस्थेला प्रश्न विचारणारी कविता

 

माणूस असण्याच्या नोंदी : व्यवस्थेला प्रश्न विचारणारी कविता 



‘माणूस असण्याच्या नोंदी’ या शीर्षकावरूनच आपण या कवितासंग्रहात नेमक्या कशा स्वरूपाच्या कविता असतील याचा अंदाज बांधू शकतो. माणूस म्हणून जगत असताना आपण साध्या साध्या गोष्टीच्या नोंदी घेत नसतो. एखादी घटना, घडामोड अशी असते की, त्या घटनेची नोंद आपण घेतलेली असते. एखाद्या वेळी जाणूनबुजून एखाद्या बाबीकडे दुर्लक्ष करायचे असेल तर त्या गोष्टीची कोणीही नोंद घेत नाही.

कोणत्या जातीत-धर्मात जन्मणार हे आपल्या हाती नसते. समाज त्या बालकाला ते ज्या कुटुंबात जन्मले, त्या कुटुंबाचा धर्म चिकटवतो. पुढे मूल शाळेत गेलं की, शाळेत नाव दाखल करताना त्याची जात विचारली जाते. निरागस लेकरांना जेव्हा शाळेत धर्मावरून आणि जातीवरून विविध सेवा सुविधा मिळतात, तेव्हा त्या मुलाच्या मनात मी अमुक जातीचा आहे याची जाणीव होते. एखाद्याला एखादी सुविधा का दिली जाते आणि एखाद्याला का नाकारली जाते, यावरून तो कोणत्या जातीचा आहे, हे त्या मुलाला समजते. मूल थोडे मोठे झाले की, त्याला मुलगा-मुलगी हा भेद सांगितला जातो. जर एखादी व्यक्ती जात-धर्म विसरून स्वतःची प्रगती करत असेल, तर त्याला त्याची जागा दाखवून दिली जाते‌. 

हे सगळं पाहिल्यानंतर कवीला प्रश्न पडतो- 


‘‘माझ्या चक्रावून गेलेल्या डोक्यात प्रश्न उगवला- 

मी माणूस असल्याची नोंद 

कुणीच कशी केली नाही?’’

(पृ.१८) 


असा प्रश्न जेव्हा कवी मेघराज मेश्राम यांना पडतो, तेव्हा त्या प्रश्नाची कविता होते. ती कविता म्हणजे खरी माणूस असण्याची नोंद आहे. माणूस आहे म्हणून तो बोलू शकतो. या व्यवस्थेला प्रश्न विचारू शकतो. म्हणून या कवितासंग्रहातील कविता म्हणजेच खऱ्‍या अर्थानं माणूस असण्याच्या नोंदी आहेत.

‘बेवारस’ या कवितेतून एखाद्या माणसाची माणूस म्हणून ओळख न पाहता लगेच त्याला कोणत्या जातीचा, धर्माचा वा वर्णाचा आहे हे कसे पाहिले जाते, हे सांगताना कवी मेघराज म्हणतात-


‘तो माणूस आहे कोणीच कसे बोलत नाही’

  (पृ.१५) 


ज्या विषयावर कोणीतरी बोललं पाहिजे, बोलण्याची आवश्यकता आहे, त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. अनावश्यक गोष्टींवर लोक बोलत सुटतात. जणू नको त्या गोष्टीवर बोलायची चढाओढ लागलेली आहे. म्हणून मेघराज मेश्राम म्हणतात-


‘काळ सरकत आहे भयंकराच्या शेवाळी वाटेवरून 

चढाओढ लागलीय दगडांची उंची वाढवण्याची 

आणि माणसांचा केला जात आहे बोन्साय’ 

(पृ.१६) 


विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर भविष्यात कदाचित माणूस चंद्रावर वसाहत करू शकेल. सूर्याला आपल्या बोटांवर नाचवू शकेल एवढे सामर्थ्य माणसात येईल. पण, आजचा जो माणूस आहे, त्याला सुखानं कसं जगता येईल यासाठी कोणी काही करणार आहे की नाही? दगडी पुतळ्याची उंची वाढवण्याच्या स्पर्धेपेक्षा जो जिवंत माणूस आहे, त्याचे जे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या संदर्भाने कोणीतरी बोलले पाहिजे. पण, त्या मुद्द्याला बाजूला सारले जाते. म्हणून कवीला प्रश्न पडतो की, या माणसांचे काय? कवी मेघराज मेश्राम थेट विठ्ठलालाच ‘तू असे कमरेवर हात ठेवून कुठपर्यंत उभा राहणार आहेस’ असे विचारतात.


‘हात कमरेवर ठेवून 

तू कुठवर नुसता बघत राहशील माझ्या यातनांची गाथा 

शिलगवतोय मी माझ्या दुःखमाखल्या भाषेची वात 

गाभारा सोडून येणार आहेस की नाही ते सांग’

      (पृ.५४)


हल्ली इथे फक्त माणसंच स्वार्थीपणाने विचार करत आहेत असे नाही. तर ज्या आईच्या नात्याला आपण पवित्र समजतो, ती आईही आज आपल्या वरवरचे सौंदर्य जपण्यासाठी आपल्या चिमुकल्याला स्तनपान करत नाही. म्हणून मेघराज आपल्या आईला प्रश्न करतात-


‘हल्ली फिगर मेन्टेन करण्यासाठी 

स्तनपान टाळतात आया 

माय, तू काय मेन्टेन करत होतीस’ 

      (पृ.४३) 


बाह्य सौंदर्यापेक्षा नातं जपणारी आई म्हणूनच महत्त्वाची वाटते. या संग्रहातील अशा आईच्या आणि बाईच्या कविता मनाचा ठाव घेत, विचार करायला भाग पाडतात. बाई गं (पृ. ४२), सावित्रीची लेक (पृ. ४४), बाया (पृ. ४५), तुळसाबाई (पृ. ४७), इमलाबाई ( पृ. ४८), शूर्पणखा (पृ. ४९), आसिफा (पृ. ५३) या कवितांतून बायांच्या व्यथा-वेदना आणि प्रेम समजून घेता येते.

‘वाकळ’ ही कविता आईच्या अपार प्रेमाचं प्रतीक. तिचं वाकळ तयार करणे, गोधडीला सोयीने टाके घालणे म्हणजे आईच्या नात्याची घट्ट वीण, आपुलकी टिकवण्यासाठी मायेची गोधडी बनवणे.

अवतीभवतीचे भयाण वास्तव पाहिल्यानंतर कवीच्या मनाची तगमग होत असते. तो त्याच्या कवितेच्या माध्यमातून ती तगमग मांडण्याचे आणि समाजातल्या सर्वसामान्य माणसाच्या अडचणींची दखल घेण्याचे काम करत असतो. म्हणून कवी नेहमीच विरोधी पक्षातला असल्यासारखा असतो. म्हणून कवी-लेखकाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा संशयाचा असतो. कवीनं जरी कधी हातात शस्त्र घेतलेले नसले किंवा कुठे कोणता गुन्हा केलेला नसला, तरीही त्याच्याकडे संशयाच्याच नजरेने पाहिले जाते. म्हणून कवी मेघराज मेश्राम कवीकडे संशयाच्या नजरेने पाहणारांना प्रश्न करतात-


‘मी फक्त

कवी आहे

तुम्ही माझ्याकडे

संशयाने का पाहता’

          (पृ.२९)

‘कविता अन् मृत्यू’ आणि ‘कवींना नोटीस’ या दोन कवितांतून कवी काय आहे आणि तो काय करू शकतो, हे सांगितलेले आहे. पण, आजच्या काळात मुक्तपणे लिहिण्याचे, बोलण्याचेही बंधन आहे. पण, कवी त्याच्यावर कितीही बंधनं आली तरीही विचारांची पेरणी करतच राहतो. त्याला अन्याय-अत्याचार सहन करणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनात कुठेतरी उजेड पेरायचा असतो. म्हणूनच ‘माणूस असण्याच्या नोंदी’ या कवितासंग्रहात अनेक कवितांमधून उजेड, प्रकाश, महासूर्य हे शब्द वैचारिक उजेड आणण्याच्या दृष्टीने योजलेले दिसून येतात. फुटवे (पृ. २५), कवींना नोटीस (पृ. ३३), कवितेतील पाणी (पृ. ३८).      

सर्वसामान्यांची मुस्कटदाबी होत असणाऱ्या दिवसातही कवी सामान्यांच्या मनात उजेडाची पेरणी करण्याचा प्रयत्न करतो. त्याला हिमतीनं जगण्याचं बळ देताना कवी म्हणतो-


‘असा कच खाऊ नकोस भाऊ 

ऊठ, काळोख नांगरून काढू 

उजेडाची पेरणी करू’ 

            (पृ. २४)

कवितासंग्रहाला राजू बाविस्कर यांचे सुंदर मुखपृष्ठ आणि रेखाटन असून प्रसिद्ध कवी प्रफुल्ल शिलेदार यांची पाठराखण आहे. प्रफुल्ल शिलेदार मेघराज मेश्राम यांच्या कवितेबद्दल म्हणतात- ‘‘मेघराज मेश्राम यांची कविता कुठलाही अभिनिवेश नसलेला प्रामाणिक उद्गार आहे. झगमगत्या जगातील आपल्या कळाहीन आयुष्याबाबत बोलताना ती नकळतपणे समाजाच्या परिघाबाहेरील वर्गाचा विश्वसनीय आवाज होते. जगण्यातील भयाणपणामुळे येणारी, जीवनेच्छेच्या मुळांना नख लावणारी, पराकोटीची अस्वस्थता त्यांच्या कवितेत जागोजागी दिसून येते.


कवितासंग्रह : माणूस असण्याच्या नोंदी  

कवी : मेघराज मेश्राम

प्रकाशन : लोकवाङ्मय गृह, मुंबई 

पृष्ठ : ७२

मूल्य : १५० 

...


शरद ठाकर

सेलू, जि. परभणी

मो. ८२७५३३६६७५


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा