एकूण पृष्ठदृश्ये
१९ जानेवारी २०२६
अंतर्मुख करणारी कविता: मनातल्या मनात वाचायच्या कविता
०६ जानेवारी २०२६
माणूसपणाच्या संवेदनांची कविता : शाबूत राहो हे लव्हाळे
माणूसपणाच्या संवेदनांची कविता : शाबूत राहो हे लव्हाळे
"शाबूत राहो हे लव्हाळे" या शीर्षकाचा विचार केला,तर शाबूत राहो हे लव्हाळे असे कवयित्रीने का ? म्हटले असेल असे वाटते.लव्हाळं ही एक तृणवर्गीय बारमाही वाढणारी वनस्पती असून,ती पाणथळ आणि ओलसर जागेवर वाढते. लव्हाळ्यालाच 'नागर मोथा' असेही म्हटले जाते. लाव्हाळ्याची मूळं घट्ट रोवलेली असल्याने नदीला कितीही पूर आला तरीही लव्हाळे वाहून जात नाही.तृणवर्गीय असल्याने पाण्याच्या प्रखर प्रवाहातही लव्हाळे सहज झुकते आणि त्यावरून पाण्याचा कितीही मोठा पूर गेला तरी लव्हाळे पूर गेल्यानंतर पुन्हा जोमाने उभे राहते.तसे पाहिले तर लव्हाळे हे एक तण देखील आहे.उसाच्या पिकात ते जास्त होते.इथे तण या अर्थाने निश्चितच त्याचा वापर केलेला नाही.संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात म्हटलेले आहे "महापुरे येती, तेथे लव्हाळे राहतील"
वरवर विचार केला तर महापूर आला,की नदीच्या भोवताली असलेले मोठमोठे झाडं त्यांच्यातील गर्वाने ताठ उभे राहतात आणि पुराच्या पाण्यात तुटतात,वाहून जातात तर लव्हाळे त्याच्या नम्रता, लवचिकपणा या गुणामुळे टिकून राहते.
न झुकणारे मोठे झाड म्हणजे अशी माणस जी अहंकार,गर्व,कठोरपणाने वागतात,जी आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेत नाहीत; तर लव्हाळे म्हणजे ज्यांच्याकडे नम्रता आहे,लवचिकपणा आहे ,साधेपणा आहे आणि ज्यांना प्राप्त परिस्थितीनुसार लवता,झुकता येते. त्यामुळे अशी माणसं आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही आणि कितीही मोठ्या संकटात,अडचणीत सहजपणे मात करून पुढे जातात.
झुकणे हे कोणाला लाचारपणाचे लक्षण वाटेल,पण आपण कधी,कुठे,कशासाठी आणि का ? झुकत आहेत हे लक्षात घेऊन.आपला स्वाभिमान,आपली तत्त्व जिवंत ठेवून वेळ प्रसंग पाहून कधी कधी झुकणेही महत्त्वाचे असते. कारण न झुकता मोडून पडण्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेत दोन हात करणे महत्त्वाचे असते.
आजच्या काळाचा जर आपण विचार केला, तर सर्वसामान्य माणसाचा या काळात निभाव लागणे शक्य वाटत नाही.प्रत्येक माणसाच्या मनावर एक वेगळ्या प्रकारचे दडपड या अस्थिर,संभ्रम निर्माण करणाऱ्या काळात आहे.
सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,स्त्रियांचे प्रश्न,पर्यावरण आणि ढासळत चाललेली मूल्य, हा जो सर्वार्थाने अस्वस्थतेचा महापूर आहे.या महापुरात हे लव्हाळ शाबूत राहिले पाहिजे असे कवयित्रीला वाटते.शीर्षकातील हे म्हणजे कोणते लव्हाळे याचे उत्तर अंजली कुलकर्णी यांच्या मनोगतातून आपल्याला मिळते.त्या म्हणतात
"सर्वत्र प्रलयासारखा महापूर उसळलाय आणि रोरावणाऱ्या पाण्यातून महावृक्षा सकट जगण्याचं सारं काही वाहून जाताना.स्वतःला बचावून ठेवण्याची वेळ इथल्या दुर्बल लव्हाळ्यावर आली आहे.या अक्राळ विक्राळ महापुरातील लव्हाळं शाबूत राहिले पाहिजे याच एका ध्यासाची ही कविता आहे."
लव्हाळं तर महापुरातही जगणारे टिकणारे आहे,मग ते दुर्बळ कसं असू शकेल.निश्चितच ते दुर्बळ नाही.हे लव्हाळे म्हणजे इथल्या व्यवस्थेमुळे पिचलेला,कोंडीत अडकलेला,दुर्बल झालेला माणूस आहे. हा दुर्बल झालेला माणूस जिवंत राहिला पाहिजे.त्याच्या मनात जी लव्हाळ्याच्या अंगात असलेली नम्रतेचे,रुजूतेची, माणुसकीची भावना आहे.ती भावना कठीण काळात राहून-राहून कठोर होऊन न जाता माणसाच्या मनातली माणुसकीची भावना जिवंत राहावी.या ध्यासाने कवयित्री कविता लिहिते असे वाटते.
सध्या सगळीकडे विनाशाची साथ पसरलेली आहे की काय ? असे कवयित्रीला वाटते,कारण जिकडे तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अविचारी विषाणूंचा प्रसार झाल्यामुळे द्वेष, हिंसा,धर्मांधता, वादविवाद,जाती जातीत,धर्माधर्मात तेढ निर्माण झालेली आहे.
'घराणेशाही' या कवितेतून त्या मेन होल मधला मैला काढण्याचे काम करणाऱ्या कामगारांची घराणेशाही उलथून टाका असे उपरोधितपणे म्हणतात ,कारण देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष होऊन गेली.तरीही विशिष्ट समाजाला मैला साफ करण्याचे,डोक्यावरून वाहून नेण्याचे काम करावे लागणे आणखी थांबलेले नाही.
गाव खेड्यात माणसाच्या हाताला काम नाही आणि शेती करावी तर शेतमालाला भाव नाही, म्हणून खेड्यातून माणसांचे लोंढेच्या लोंढे शहरात येतात. शहरात येऊन कुठेतरी कसेतरी राहतात.ते धड गावाचेही नाही आणि शहराचेही नाही अशा पद्धतीने कायमचे विस्थापित होतात.काहीतरी स्वप्न उराशी बांधून गाव खेड्यातून शहरी संस्कृतीच्या झगमटात,शहरात आल्यानंतर त्यांची स्वप्न काही पूर्ण होत नाहीत,त्यांच्या त्या मृत स्वप्नांच्या लगद्याचा चेहरा बनवला, तर तो कसा असेल, कसा दिसेल हे सांगताना त्या म्हणतात.
" 'आपल्या लोकशाही प्रजासत्ताकात
सर्वांना समान न्याय सर्वांना समान संधी'
देणाऱ्या संविधानासारखा
मानवी दिसेल ?
की 'सबका साथ, सबका विकास'च्या
पताका मिरवणाऱ्या कुण्या ओसाड
नगरासारखा दिसेल?" (पृ.४२)
माणूस वास्तव काय आहे.याचा विचार न करता वास्तवात जगायचे सोडून. सोशल मीडियाच्या दुनियेत आपले सर्वस्व विसरून जीवन जगत आहे. त्या सोशल मीडियाच्या अवास्तव प्रदर्शन करण्याच्या नादात वास्तव जगणे,त्या जगण्याचा,खाण्याचा,पाहण्याचा आनंद न घेता.जिथे तिथे फोटो घेणे,सेल्फी काढून विविध समाज माध्यमावर पाठवणे आणि त्या माध्यमाला चिकटून राहून आनंद घ्यायचा सोडून किती लोकांनी लाईक आणि कमेंट केले.हेच पाहत बसण्यात धन्यता म्हणणारे माणसं आज आपल्याला आपल्या अवतीभवती दिसून येतात. हे वास्तव त्यांनी विंडोतलं आकाश (पृ.३३,३४),सेल्फी (पृ.३५),सोशल मीडिया (३६),
या कवितांमधून मांडले आहे.सोशल मीडियाच्या जमान्यात माणूस सोशल व्हायच्या ऐवजी एकलकोंडा,संकुचित,आत्ममग्न,आत्मप्रौढी मिरवणारा झाला आहे.माणसातली माणुसकी वरच्यावर हरवत चाललेले आहे,त्यामुळे त्या 'हे काय आहे ?' या कवितेत म्हणतात.
"हे जगणे आहे की
किड्या मुंग्यांचा बेहाल आक्रोश ?
कुठे हरवलाय माणसांचा
होश? जोश?" (पृ.४३)
माणूस म्हणून आपण काय केले पाहिजे आणि काय करत आहोत याचे भान माणसाला राहिले नाही.
विज्ञान तंत्रज्ञानाने प्रगती झाली आहे.जग मुठीत आले आहे.खिडकीतून हाक मारता मारता सातासमुद्रा पलीकडे ऑनलाईन विंडो उघडून हाक मारता येत आहे.घरात बसून खरेदी करता येत आहे.लिफ्टने कितव्याही मजल्यावर सहज जाता-येता येत आहे.एवढेच नाही तर माणसाचे आयुर्मानही वाढले आहे;पण आपलीच मुलं आपल्या जवळ न राहता कुठेतरी दूरदेशी राहत असतील,माणसात माणूस राहत नसेल,तर अनेक वर्ष जगण्याचे माणसाचे प्रयोजन काय आहे ? हे विचारताना त्या म्हणतात.
"कळत नाहीये ते एवढंच
रिप्लेस केलेले गुडघे,हार्ट,लिव्हर
नि किडन्या सांभाळत
या झगमग एकाकी उजेडात
दीडशे वर्ष जगण्याचं
प्रयोजन तरी काय आहे ?"
(पृ.३९)
हा काळच कसा वेगळा आला आहे असे कवयित्रीला वाटते.प्रत्येकाच्या हातात पैसा आलेला आहे.शहरा शहरातून पैशाचा महापूर वाहतोय,पण संस्काराचा झरा मात्र अटत चाललेला आहे.राजकारण,समाजकारण आता म्हणायलाच राहिले आहे.कवितेच्या माध्यमातून कोणावर काही परिणाम होईल हे शक्य वाटत नाही.प्रत्येकाला आपला आपला स्वार्थ साधायचा आहे, त्यामुळे कविता आता फक्त कवी पुरतीच मर्यातीत झालेली आहे असे कवयित्री अंजली कुलकर्णी यांना वाटते;म्हणून त्या म्हणतात
"माणसापर्यंत पोहोचतच नाहीये कविता
अख्खा समाज झाला आहे बहिरा नि मुका"
(पृ.२०)
स्त्री आणि नदी यांच्या संदर्भात पराभवांची सुंदर फुले (पृ.७०),समजल्यावर (पृ.७१), सातत्याच्या नदीतून (पृ.७२),जिम्मेदार (पृ.७३),वाहते ती नदी (पृ.७४), जंजाळ जाळात (पृ.७५) या कवितांमधून त्यांनी स्त्रीचा संघर्षशील इतिहास स्त्री कशी विसरत चालली आहे.हे सांगताना स्त्रीने टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवावी तसेच स्वतःला अवहेलना झेलत,नकार पचवत कसे कणखर,खंबीर बनवले हे सांगितले आहे व तिला जाणीवपूर्वक जन्मापासून स्त्री म्हणून कसे घडवल्या जाते व स्त्री ही एक व्यक्ती आहे,माणूस आहे.हे समाज समजून घेत नाही.तेव्हा इथल्या स्त्रीने जी सामाजिक विषमतेची चौकट आहे.ती कुठेतरी मोडली पाहिजे असे वाटते.स्त्री आणि पुरुष हे दोघेही समान पद्धतीने पुढे गेले पाहिजे, पण तसे होत नाही.तेव्हा काय होते हे त्या पुढील शब्द सांगतात
"एकट्यानेच उंच वाढणारा वृक्ष
नेहमीच वाटला करंटा
भोवतालाची ओळख होताच
हरळीसारखी पसरत गेले" (पृ.७१)
नदी जशी माणसांचे सगळे अपराध पोटात घालत माणसाच्या चुकीच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करत पुढे चालत राहते.दगडधोंडे, हार,फुल, निर्माल्य,प्लास्टिक,कचरा प्रेतांचे अवशेष घेऊन नदी पुढे जाते. तसेच स्त्रीही अपमान,अवहेलना, विटंबना या गोष्टींना सहन करत पुढे जाते.खरं तर नदीने स्त्रीचे आणि स्त्रीने नदीचे परंपरेने चालत आलेले प्रतीक आता नाकारले पाहिजे,नाहीतर काळ सोकावेल आणि असे अन्याय सहन करत राहावे लागतील,म्हणून त्या म्हणतात.
"माणसांचे कचरा भरले अपराध
दोघींनीही घालू नये पोटात
नि पाहू नये उघड्या डोळ्यांनी
स्वतःची मुस्कटदाबी मुकाट
त्यापेक्षा द्यावी त्याला वेळेवर
शहाणीवेने एक जोरदार चपराक"
(पृ.७३)
पुरुष,स्त्री व तृतीयपंथी या तो,ती,ते या लिंग भेदा पलीकडे जाऊन सर्वांनी माणूस म्हणून जीवन जगणे आवश्यक आहे,पण स्त्री वा पुरूषाचा तृतीय पंथीथ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही बदलत नाही.तो बदलावा अशी कवयित्रीची अपेक्षा आहे.माणसाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही काही बदलत नाही.स्त्री-पुरुष भेद विसरून एक मित्र म्हणून स्त्रीला पुरूष हवा असतो .जो स्त्रीच्या रूपावर वा स्त्रीपणावर नजर न ठेवता तिला केवळ एक माणूस म्हणून समजून घेणारा हा असतो,पण असे होत नाही त्याबद्दल त्या म्हणतात
"पण हे पुरुष.. पुरुषच राहतात अखेर पर्यंत
जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत
मनाचं कधीच नाही कळत त्यांना
शेवटी शरीरावरच त्यांची सारी भिस्त"
(पृ.८०)
स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहण्याऐवजी वस्तू म्हणून पाहिलं जातं सोशिकता,धर्मभोळी म्हणून भावनिक गुंत्यात गुंतवून उपवास,देवदेव करणाऱ्या स्त्रीला कळत नाही.ती किती नको त्या बंधनात स्वतःहून अडकून गेली आहे. बाया काही सुधारायचे नाव घेत नाहीत म्हणून त्या म्हणतात. "या बायकांचे काय करू" खरंतर माणसाला भीती वाटते.ती हुशार होईल या गोष्टीचे, म्हणून तिला शिकू दिल्या जात नाही, स्वतंत्रपणे निर्णय घेऊ दिला जात नाहीत.तिच्या कर्तृत्वाला कमी ठरवण्यासाठी तिला देवी बनवल्या जाते, तिचा छळ केल्या जातो,तिला वस्तू म्हणून वापरलं जातं कारण
"तिची धार, तिची शक्ती, तिची क्षमता
त्याला ठाऊक असते
म्हणून त्याला सारखी भीती वाटते
सारखी भीती वाटते"(पृ.९२)
'जन्म दे' (पृ.९३) या कवितेत कवयित्री माणसाच्या न्याय बुद्धीला जन्म दे,स्त्री पुरुष समानतेलाही जन्म दे म्हणतात,कारण जोपर्यंत माणसाचे मन निर्मळ होणार नाही,तोपर्यंत ही सृष्टी नितळ,निर्मळ होणार नाही.
कथुआ,कलम ३७०,शरबत गुल या कवितांमधून माणसाची हिंसक वृत्ती त्यांनी अधोरेखित केली आहे. शेवटी कितीही संकटे असली तरी माणूस आपले जीवन त्या संकटाचा सामना करत करत पुढे जगण्याचा प्रयत्न करतो आणि खरे तर रोजच्या आपापल्या कामातच खरा जगण्याचा आनंद मानतो.माणसाची ही जी जगण्याची इच्छा आहे.तिला अंजली कुलकर्णी यांनी 'सिसिफस' या कवितेतून अधोरेखित केलेले आहे.सिसिफस हे ग्रीक पौराणिक कथेतील मिथक आहे.ज्यात करिंथचा राजा सिसिफस याला देवांनी मृत्यूची फसवणूक केल्याबद्दल शिक्षा म्हणून एका डोंगरावर दगड ढकलण्याची शिक्षा दिलेली असते.दगड शिखरावर पोहोचताच पुन्हा तो खाली घसरतो आणि हेच काम त्याला पुन्हा पुन्हा करावे लागते म्हणजे कितीही काळ हे काम केले तरी ते पूर्ण होणार नाही.हे मिथक जीवनातील निष्फळ आणि निरर्थक कामाचे प्रतिक आहे.अल्बर्ट कामू या विचारवंताने अशा कामातूनच जीवनाचा अर्थ शोधण्याचे सांगितले आहे.संघर्षातच माणूस आनंद शोधत असतो.
'शाबूत राहो हे लव्हाळे' मध्ये संवेदना ही प्रतिमा खूप वेळा वापरलेली आहे.स्युडो संवेदना (पृ.२०), संवेदना मुक्त माणूस (पृ.३०),संवेदनाचा अस्वस्थ झरा (पृ.५९),संवेदनेचे साम्राज्य (पृ.६१) ,संवेदनांचे सुंदर मोती (पृ.८८), संवेदनाचा सोबती (पृ.१०४),संवेदनाचा पहारेकरी(१०९),संवेदना कोरल्या (पृ.११३),गतकाळातील संवेदना (पृ.११७),चेहऱ्यावरची संवेदना(पृ.११८), संवेदनांचा प्रवास (पृ.१२१)
एकंदरीतच माणूसपणाच्या संवेदनांनी ही कविता समृद्ध झालेली आहे.
त्यांच्या कविता लेखना मागची भूमिका त्यांनी मी लिहिते तेव्हा (पृ.१११),संवेदना(पृ.११३), कवितांनो (पृ.११४), समजेचा क्षण (पृ.११५), जुन्या कविता चाळताना (पृ.११६,११७),न लिहीता आलेली कविता (पृ.११८),कोवळे कवित्व (पृ.११९), या कविताच (पृ.१२१),कवी (१२३), अशी एखादी कविता (पृ.१२४),ढकलले जातोय (पृ.१२५),कवी लिहीत होता कविता (पृ.१२६) या कवितांमधून मांडलेली आहे.
कविता लिहीत असताना कवी मनाची होणारी अवस्था काय होते हे सांगताना त्या म्हणतात.
"मी लिहिते तेव्हा
उसळतात लाटांवर लाटा
समुद्राला भरती येते
पूर्ण चंद्र बनून कविता
आसमंत उजळून घेते"
(पृ.१११)
कवीला कविता लिहिताना बऱ्याचदा आपलीच कविता आवडत नाही.ती लिहून व्यवस्थित पूर्ण झाली असे वाटत नाही.जेव्हा ती आपल्या मनासारखी लिहून होते.तेव्हाच कुठे कवीला समाधान होत असते आणि त्यामुळे अनेक कवितांच्या ओळी लिहून फेकून द्याव्या लागतात. त्यांना पुस्तकात न घेता आल्याचेही दुःख कवयित्रीला वाटते.कवीची कविताच खरे तर कविचे आत्मचरित्र असते.पुन्हा वेगळे आत्मचरित्र लिहिण्याची गरजच कवीला पडत नाही या कविता त्यांचा कणा आहेत त्या म्हणतात.
"मी सोडून दिला आहे स्वतःला
संवेदनांच्या वाहत्या पाण्यात
आता तरेन किंवा बुडेन
हे कविताच ठरवणार आहे" (पृ.११५)
कवीने कविता लिहून मोकळे व्हायचे असते. ती कशी आहे ? ,काय आहे ? याचा विचार वाचणारे करतील.त्या पद्धतीने कविता लिहून त्या मोकळ्या झाल्या आहेत;पण निश्चितच त्यांच्या कवितेत माणुसकी जिव्हाळा सर्व प्राणीमात्राबद्दलची आपलेपणा,आपुलकीची आणि संवेदनशीलतेची भावना असल्याने कितीही मोठ्या प्रवाहात हे लव्हाळ निश्चितच अखंड तगून राहणार आहे हा विश्वास आहे.अंजली कुलकर्णी 'लव्हाळे' या कवितेत म्हणतात ते कोणते पाणी आहे.ज्याने त्यांना कवितेच्या सरोवरात वरचेवर धरले आहे,तर हे कवितेच्या प्रेमाचे,जिव्हाळयाचे पाणी आहे आणि त्या पाण्यात त्यांनी कवितेच्या अंतस्फूर्तीची बीज भर पावसात खोल खोल रोवलेली आहेत,त्यामुळे त्यांनाही विश्वास आहे.हे लव्हाळे शाबूत राहणार आहे,म्हणून त्या म्हणतात.
"कदाचित त्या पुरानेच
मला आपले म्हटले
महावृक्ष वाहून जाताना
हे हरवलेले लव्हाळे शाबूत ठेवले"
(पृ.१२०)
कवितासंग्रह - शाबूत राहो हे लव्हाळे
कवयित्री - अंजली कुलकर्णी
प्रकाशन - सृजन संवाद प्रकाशन
प्रकाशक - सृजनसंवाद
प्रकाशन,ठाणे
पृष्ठ -१२८
मूल्य - २५०
डॉ.शरद ठाकर
सेलू जि परभणी
८२७५३३६६७५
०२ डिसेंबर २०२५
जीवन जगण्याची सकारात्मकता देणारी कादंबरी : ऊन सावलीच्या शोधात
जीवन जगण्याची सकारात्मकता देणारी कादंबरी : ऊन सावलीच्या शोधात
१९७२ चा दुष्काळ सर्वांनाच परिचयाचा आहे.त्यातल्या त्यात १९७२ चा दुष्काळ मराठवाड्यात भीषण होता. त्या दुष्काळी दिवसाचे एकंदरीत चित्रण 'ऊन सावलीच्या शोधात' या कादंबरीत आलेले आहे.आधीच मराठवाडा निजामाच्या वर्चस्वाखाली असल्याने, मराठवाड्यात पाहिजे तशी कशाचीच मुबलकता,अबादी आबादपणा नव्हता.निजामाच्या या सुलतानी तावडीतून मराठवाडा मुक्त झाला आणि त्यानंतर लगेचच १९७२ यावर्षी दुष्काळ पडला.त्या दुष्काळाचे ग्रामीण जीवनावर खूप गंभीर परिणाम झाले.त्या गंभीर परिस्थितीतही लोक मात्र आपल्यातली माणुसकी विसरले नव्हते.हे या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी दिसून येते.वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक फार जिव्हाळ्याने,आनंदाने एकत्र नांदत होते.हा जिव्हाळाच भीषण दुष्काळातही सर्वांना प्रेमाचा गारवा देणारा होता.त्या प्रेमाच्या गारव्याने दुष्काळाच्या झळाही सर्वांना सुसह्य झाल्या आणि त्या दुष्काळातही माणसं त्यामुळे जगली,टिकली.
'ऊन सावलीच्या शोधा' या कादंबरीच्या शीर्षकाचा जर विचार केला,तर शेतकरी,शेतमजूर आणि एकंदरीतच ग्रामीण भागात जीवन व्यतीत करणाऱ्या कोणाचाही विचार केला तर ऊन जसे कायम जळणारे,होरपळणारे , जीवाची तगमग करणारे असते. त्याच पद्धतीने शेतकरी, शेतमजुराचे जीवनही, त्या उन्हाच्या सारखेच दुसऱ्यासाठी जळणारे,कष्टणारे, धडपडणारे आहे. ऊन्हाला जसा कधीच सावलीचा शोध लागणार नाही;की सावली कधी भेटणारही नाही.त्याच पद्धतीने शेतकरी, मजूर यांनाही त्या उन्हाला जशी सावली भेटणे शक्य नाही अगदी त्याच पध्दतीने शेतकरी,कष्टकरी,मजूर यांनाही कितीही कष्ट केले,मेहनत घेतली तरीही सुख,समाधान,आनंद कधीच मिळेल शक्य वाटत नाही,कारण कष्टकऱ्यांच्या जीवनात कधी निसर्ग साथ देत नाही, तर कधी व्यापारी,कधी शासन त्याला साथ देत नाही.एकतर शेती पिकत नाही आणि पिकली तर त्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे उन्हाने सावलीचा कितीही शोध घेतला, तरी त्या उन्हाला सावली कधीच भेटणे शक्य नाही.अगदी त्याच पद्धतीने शेतकऱ्याला,कष्टकऱ्यांनाही कधीच सुखाचा शोध लागणार नाही.ज्या दिवशी कष्टकऱ्याला सुखाचे,आनंदाचे दिवस येतील. तो दिवस खरोखरच सर्वांच्यासाठी आनंदाचा,भाग्याचा असणार आहे.
काळासोबत चालत नाही त्याला काळ कधीच माफ करत नाही आणि काळासोबत न चालणारी माणसं कुठेतरी मागे पडतात,म्हणून बा.बा.कोटंबे यांनी काळासोबत चालणं आवश्यकच आहे हे लक्षात घेतलेले आहे. काळा सोबत चालून रहाणेही शक्य नाही ,म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता काळासोबत धावणाऱ्यांना ही कादंबरी अर्पण केलेली आहे.
१९७२ चा मार्च महिना नुकताच उजाडलेला अशी कादंबरीची सुरुवात होते आणि १९७२ च्या भीषण दुष्काळाचे भयान चित्रण कादंबरी वाचत जाताना आपल्या डोळ्यासमोर उभे राहते आणि आपणही त्या दुष्काळी होरपळीत होरपळून जातो.हा दुष्काळ एवढा भयानक होता,की कितीही श्रीमंत घरातल्या बाया माणसांनाही शासनाने दुष्काळी परिस्थितीत लोकांना काम मिळावे,ते उपाशी राहू नयेत;म्हणून सुरू केलेल्या नाला बल्डिंग,रस्ते आणि इतर कामावर काम करावे लागले. शेतात पीक-पाणी नाही.कोणाच्याही घरात मुबलक अन्नधान्य नाही.त्यामुळे चिवळ, बरबडा अशा कधीही अन्न म्हणून न खाल्लेल्या गोष्टी दुष्काळामध्ये लोकांना खाव्या लागल्या.गवताबरोबर उगवणाऱ्या रानभाज्या तांदूळगा, कुर्डू, तरोटा,फांजची भाजी अशा काही रानभाज्या मिळायच्या. त्यामध्ये मीठ-मिरची लावून खाव्या लागायच्या.त्या जर जास्त खाल्ल्या तर त्यामुळे संडासही लागायची.शेर अर्धा शेर ज्वारी मिळाली,तर तीन हिस्से भाजी आणि पाव हिस्सा पीठ घेऊन भाकरी बनवायच्या आणि त्याच खायच्या अशी कठीण परिस्थिती दुष्काळामुळे निर्माण झालेली होती.
स्वतःची गुरं ढोरं सांभाळणे खूप अवघड झाले होते.गुरं ढोरं अन्न पाण्या वाचून मरून पडत होते.पिंपळगावच्या वैजनाथरावाकडे नगरच्या संपतरावांनी पंधरा-वीस जनावर सांभाळण्यासाठी पाठवले होते. वैजनाथरावांना त्यांचीच गुरं ढोरं सांभाळणे अवघड झालेला असताना आपल्या विश्वासावर पाठवलेली ढोरं ठेवून घेऊन ते सांभाळणं म्हणजे खूपच कठीण काम.आपल्यावरच्या विश्वासामुळे वैजनाथरावांनी दुष्काळी परिस्थितीत आपल्या गुरांसोबत जशी जगवता येतील तसे तशी गुरं जगवणे ही मोठ्या मनाची गोष्ट आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंब मिळेल ते काम करत होते.व्यंकू असाच विहीर खोदताना बार उडवतांना पळताना पाय अडकून पडला आणि त्याच्या पायावर विहिरीतील बाराचा भला मोठा दगड पडून अपंग झाला, त्यामुळे त्याला कुठे काम करता येत नव्हते; पण त्याची बायको संगीता हिम्मतवान होती पतीच्या अशा अवघडलेल्या परिस्थितीत सडकेच काम चालू होतं तिथे कामाला जाते. गरीब परिस्थिती आणि नाडलेली संगीता या गोष्टीचा फायदा घेत कारकून संगीताला बळजबरी करून त्रास देतो.संगीता पहिल्याच दिवशी त्या कारकुनाची वाईट नजर ओळखते, पण परिस्थिती कठीण असल्याने तिथे काम करणे आवश्यक असते आणि शेवटी तो कारकून जे करायचे नाही तेच करतो.संगीता गलित गात्र होऊन पडते.उठल्यावर तिच्या बाजूला वीस रुपयाची नोट दिसते.ती त्या नोटीचे तुकडे- तुकडे करून त्या नोटेवर थुंकते यावरून संगीताचा स्वाभिमान दिसून येतो..
त्यानंतर संगीता बरेच दिवस घडलेल्या परिस्थितीबद्दल अपराधाची भावना मनात ठेवून खिन्न मनाने कामावर जाते.तिचा पती व्यंकुही सोबत लंगडत लंगडत कामावर येतो आणि जोराच्या पावसामुळे व्यंकूची जी फजिती होते.त्या अडचणीच्या वेळी सलीम,रोहिदास,तुकाराम व त्याची बायको,वामन,दामू हे सगळेजण दिव्यांग व्यंकुला त्याच्या लेकरवाळ्या पत्नी संगीताला मदत करतात.यावरून या सर्व माणसांना परिस्थितीने कितीही गांजले तरी त्यांच्या मनाची जी श्रीमंती आहे.ती कुठेच कमी नाही.हे या प्रसंगातून दिसून येते.दिवस कितीही खराब आले तरी एकमेकांच्या सहकार्याने केवढाही दुष्काळ अन् केवढेही संकटं हे सुखकर होतात.हे पिंपळगावच्या लोकांच्या वागण्यातून दिसून येते.पावसाळ्यात ओढ्याला आलेल्या पावसात अडकून पडलेल्या व्यंकू आणि संगीताला तुकाराम आणि त्याची बायको गाडग्यात रेशनच्या वाटी-दीड वाटी तांदूळ असताना रात्री उशिरा शिजवून खाऊ घालते. त्यासोबतच हायब्रीडच्या काढणीनंतर आलुतेदार बलुतेदारांना तुकारामने सढळ हाताने बलुतं देणे.हे परिस्थितीने गरीब असणाऱ्या;पण मनाने प्रचंड श्रीमंत असणाऱ्या तुकारामच्या कुटुंबाचे दर्शन त्या निमित्ताने घडते.
दुष्काळी परिस्थितीत मदत करणारे जसे होते, तसे काही त्या परिस्थितीचा गैरफायदाही घेणारे लोक कादंबरीतून दिसून येतात. दौलतराव सारखा सावकार आव्वाच्या सव्वा भावाने पैसे,धान्य देऊन लोकांना लुबाडण्याचे काम त्या टापूतल्या दहा-पंधरा गावात करत होता.शेवटी त्याचे कसे हाल झाले हे कादंबरीत मुळातून वाचावे.अशी माणसं त्याच काळात होती असे नाही तर आजही बऱ्याचदा दुष्काळ पडला पाहिजे असे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना वाटते.कारण त्या परिस्थितीचा फायदा कसा उचलायचा हे त्यांना चांगले माहीत असते.त्यामुळे सुकाळा ऐवजी दुष्काळ अशा लोकांना खूप आवडत असतो.
१९७२ च्या दुष्काळात माणसे जशी पोटाची आग भागवण्यासाठी बेजार होते.तशीच शिकारी प्राणीही मानवी वस्तीत घुसून शेळ्या,मेंढ्या,कुत्रे यांना खाऊन जीव जगवण्याचा प्रयत्न करत होते.शेवटी पोटाची आग माणूस असो,की जनावर कोणाला सहन होत नाही आणि जो तो आपल्या पोटासाठी आक्रमक होऊन अन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. भूक हे अंतिम सत्य आहे.
वडार समाजाच्या मुलीला रात्री पालावर साप चावतो. तेव्हा तुकाराम आणि सलीम मदतीला धावून जातात. दवाखान्यात नेऊन मुलीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात.मुलीला दवाखान्यात काही प्रयत्न करून होत नाही. तेव्हा अंगारे धुपारे करूनही काही उपयोग होणार नाही.हे माहीत असून सलीम आणि तुकाराम मुलीच्या आईच्या समाधानासाठी तोही प्रयत्न करतात. काम करायला आलेले कुठले,कोण लोक पण त्याही दुष्काळी परिस्थितीत तुकाराम,सलीम,वामन,रोहिदास, दामू मुलीची मूठमाती केल्यानंतर भाजी-भाकरी घेऊन येऊन त्या कुटुंबाला जेवू घालतात.कारण हातावर पोट असणाऱ्यांना दुःख उगाळत बसता येत नाही.आलेल्या परिस्थितीला तोंड देत पुढे चालावे लागते.आडी नडीला आपल्या घासातला घास दुसऱ्याला देण्याची दानत या भयानक दुष्काळातही लोक विसरलेले नव्हते हे विशेष.
ह्या कादंबरीतील माणसेही मनाने खूप खंबीर आणि हिम्मतवान असल्याचे दिसते.आडी नडीला धावून जाणारी माणसं या कादंबरीत जसे भेटतात.तसेच जात धर्म विसरून हिंदू,मुस्लिम,बौद्ध,वडार असा कोणताही भेद न करता आपण सर्व माणूस आहेत.या भावनेने सगळे जीवन जगताना आपल्याला दिसून येतात.
परिस्थितीने गांजलेली संगीता कशी खंबीर आहे. हे
व्यंकू मरणाचा विषय काढतो तेव्हा संगिताच्या पुढील बोलण्यावरून लक्षात येते ती म्हणते "आता जरा दिवस बरे न्हाईत, हेबी काय घर करून राहणार न्हाईत.पुन्हा नका करू मरणा धरणाच्या गोष्टी" या वाक्यावरून तसेच
दिव्यांग व्यंकू कामावर जायचं म्हणतो तेव्हा संगीता त्याला म्हणते "माझे हात पाय आणखी शाबूतयत ,दोन लेकरं न् तुम्हाला पोसायची ताकत अजून हाय माझ्यात" यावरून संगीता किती खंबीर आणि कणखर मनाने आपला संसार नेटाने करते हे दिसून येते.
दुष्काळाने सगळं चित्रच बदलून टाकलं होत.माणूस असो की प्राणी शेवटी आशेवर जगत असतो.त्याही परिस्थितीत माणसाची जगण्याची धडपड चालू होती. माणसं असंख्य अडचणीवर मात करत जगत होती. संगीताच्या मनातली जीवन जगण्याबद्दलची सकारात्मकता.पहा संगीता एके ठिकाणी म्हणते.
"हा दुष्काळ काही घर करून राहणार नाही, महिना पंधरा दिवसाला पाऊस पडेल नंतर होईल पहिल्यासारखं" यावरून संगीताचा जीवनाकडे,जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो.
" ऊन सावलीच्या शोधा" या कादंबरीत बुडत्याला काडीचा आधार,काम नाही तर दाम नाही,तोंड दाबून बुक्क्यांचा मार,रात गयी,बात गयी, नाकी नऊ येणे, आले सरकारच्या मना तिथे कोणाचे काही चालेना, दुधाची तहान ताकावर,दुष्काळात तेरावा महिना,एक घाव दोन तुकडे,पोळा न् पाऊस झाला भोळा,उटावून शेळ्या हाकणे,सांगायला गेले तर टांगायला चाललेत,कावळा उडायला आणि फांदी मोडायला एकच वेळ आली,वाघाची शेळी करणे अशा प्रकारच्या मराठवाडी बोलीत बोलल्या जाणाऱ्या म्हणीचा आणि मराठवाडी बोलीचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येते.
कादंबरीत शेवटी दुष्काळानंतर खेडेगावातील प्रत्येकाची मुलं शिकून शहरात जातात आणि त्यामुळे सलीम,रोहिदास,वामनही त्यांच्या मुलांकडे शहरात जातात.शहरात फुकट कोण खाऊ घालणार,म्हणून इथेही त्यांना वाॅचमन सारखे काम करायला लागते; म्हणून तुकाराम म्हणतो गावात राजासारखे राहणारे हे आपले मित्र तिथं काम करताना पाहून वाईट वाटते.गावाचा लळा, गावातली शेती याबद्दलची आत्मीयता जुन्या पिढीला आहे. ती आत्मियता आताच्या पिढीला नाही हेही खर आहे. कारण आता शेतात काम करण्यापेक्षा कंपनीत काम करणे प्रत्येकाला आवडायला लागत आहे.
'ऊन सावलीच्या शोधात ' या कादंबरीतून कठीण परिस्थितीतही जीवनाकडे सकारात्मकपणे पाहणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात ही सकारात्मकता निश्चितच आनंदाने जीवन जगण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांची पाठ राखण कादंबरीचे मर्म सांगणारी आहे.सरदार जाधव यांचे समर्पक मुखपृष्ठ आणि रेखाटने कादंबरीच्या आशयाला आणखीनच धारदार बनवणारी आहेत.
कादंबरी - ऊन सावलीच्या शोधात
कादंबरीकार - बा.बा.कोटंबे
प्रकाशक-
सुनिताराजे पवार ,
संस्कृती प्रकाशन ,पुणे
प्रथम आवृत्ती :१५ ऑगस्ट २०२५
मूल्य : २५०
पृष्ठ:१४४
शरद ठाकर
सेलू जि परभणी
८२७५३३६६७५
२८ जून २०२४
भुईचा लळा लावणाऱ्या कविता - भूईचे लळासे
०९ जून २०२४
शेतकऱ्यांच्या जगण्याकडे सकारात्मकपणे पहायला शिकवणारी दीर्घ कविता: 'आयुष्य नांगरताना'
२४ सप्टेंबर २०२३
माणसाला माणुसकीच्या 'घामाची ओल धरून' ठेवायला शिकणारी कविता
माणसाला माणुसकीच्या 'घामाची ओल धरून' ठेवायला शिकणारी कविता
कवी आबासाहेब पाटील यांनी कवितासंग्रहाला 'घामाची ओल धरून' हे शीर्षक देऊन शेतकरी,कष्टकरी यांच्या श्रमाचा खरा सन्मानच केलेला आहे.शेतकरी शेतात कष्ट करतात,शेत पिकवतात.तेव्हाच माणूस आनंदाने जगू शकतो.शेतकऱ्याच्या कष्टाने,त्याच्या घामाच्या धारांनी शेतात पिक फुलून येते.प्रत्येकाच्या ताटात खायला पुरेसं अन्न मिळते.घामाची ओल धरूनच हे सगळे काही पिकलेले असते. शेतात जसे पीक उगवून यायला पाण्याचा ओलावा असावा लागतो.त्या ओलाव्या शिवाय पीक जगू शकत नाही.हे जरी खरे असले तरी त्या पिकाच्या ओलाव्यासोबतच कष्टणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाची ओल असल्याशिवाय शेतात पीक उगवून येऊ शकत नाही.
आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डची सक्ती केल्या जाते.जे आधार कार्ड आपल्या प्रत्येक गोष्टीला ऑनलाईनपणे जोडल्या गेलेले आहे.जसे की बँकेचे व्यवहार त्यासोबतच इतर ठिकाणी.त्यावरून एखाद्या माणसाचा व्यवहार कसा आहेहे त्या माणसाच्या सीबील वरून ठरवल्या जाते,पण शेतकरी माणसाला सत्वशील जगणे माहीत असते. कष्ट न करता.तो कोणाचा एक रुपयाही घेत नाही.इमानदारीने जगणे एवढेच शेतकऱ्याला माहीत असते.माणुसकीचा धर्म पाळणे हेच शेतकऱ्याला माहीत असते.शेतकरी माणसासाठी कष्ट करतोच,पण त्यासोबतच तो मुक्या जनावरांची, पक्षांची काळजी घेतो.त्याच्यातलं माणूसपण जपत असतो.हे माणूस पण सांगताना ते म्हणतात.
' माणूस या एका क्यूआरकोडवर सापडत होता काळजातल्या ओलाव्याचा तळ
(पृ.१३२)
दुसऱ्याबद्दल असलेला हा काळजातला ओलावा आता चुकूनही पाहायला मिळत नाही.आज लोक बेगडी वर्तन करून दुसऱ्याबद्दल असलेली आपुलकी दाखवतात. काही तर बोल बच्चन करून काम कमी आणि जाहिरात जास्त करतात. आजच्या काळात अशांची चलती आहे.हे सांगताना आबासाहेब पाटील म्हणतात.
'एरंड्याही खपतात गव्हाच्या दारात फक्त विकणारा ब्रॅण्डेड पाहिजे
अन् त्याच्या शब्दांवर
चोवीस कॅरेटचा होलमार्क
(पृ.४६)
आशा या स्वार्थी जगात शेतकरी कष्टकऱ्यांचे जीवन विषयक वेगळे तत्त्वज्ञान ठरलेले असते.त्यांचे त्यांचे वेगळे समजूतशास्त्र असते.कष्टकरी माणूस आपल्यामुळे कोणाला त्रास नको,म्हणून पोटाला चिमटा देत,आहे त्या परिस्थितीत दुःखातही दुःखाची जाहिरात न करता आपल्या वाट्याला आलेले दुःख.तो निमुटपणे सहन करत आनंदाने जगत असतो. त्याच्यासारखीच त्याला खंबीर साथ देणारी त्याची पत्नीही आहे त्या परिस्थितीत कुरकुर न करता शेतकऱ्याचा संसार सुखाचा करून दाखवते.कारण त्यांच्यामध्ये एक वेगळी समाज आलेली असते. त्याबद्दल ते म्हणतात.
'कितीही चांगलं खाल्लं तरी
पोटात होत नाही सोनं
हे या लोकांचं समजूतशास्त्र
जे सोपं करतं अवघड जिणं'
( पृ.९२ )
आणि ज्यांचे घर पैशाने भरलेले आहेत.ते व्यापारी,कृषी केंद्रवाले लोक निष्ठेने शेती करणाऱ्या,आपल्या कृषीकेंद्रात विश्वासाने येणाऱ्या शेतकऱ्याचा विश्वासघात करून शेतकऱ्याला हिणकस,दर्जाहीन बियाणे आणि औषधांची विक्री करतात.जेव्हा शेतकरी त्याला जगणे असह्य होते.तेव्हा औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला समजते,की कृषीकेंद्रात आता विश्वासघात असा मोफत मिळतो.
या संग्रहातली नातं ही प्रश्नोत्तराच्या संदर्भातली कविता मला खूप आवडली.आजच्या व्यवस्थेला जर कोणी प्रश्न विचारायला लागला,तर त्याचं काय होतं. प्रश्न विचारणाराला कशा कशा पद्धतीने थांबवता येईल किंवा तो प्रश्न विचारणारा प्रश्न विचारायला जिवंतच राहिला नाही पाहिजे.अशा पद्धतीची व्यवस्था असते. सर्वसामान्याला वाटते,आपण व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे आणि व्यवस्थेने त्या प्रश्नाला समर्पक उत्तर दिले पाहिजे,पण व्यवस्थेला हे मान्य नसते.म्हणून व्यवस्था काय करते हे ती पुढील शब्द सांगतात.
'प्रश्नांच्या नाकात ओवतात व्यसन व्यसनीला बांधतात दावं
जेणेकरून प्रश्न निमूट थांबतात उत्तराच्या दावणीला'
( पृ.९९)
प्रश्न विचारणारालाच, प्रश्नालाच जर उत्तरांच्या दावणीला असे बांधले तर प्रश्न विचारणारा तयारच होणार नाही आणि मग उत्तरे तोऱ्यात आनंदाने राहू शकतात.असा हा सध्याचा काळ आहे.
कविता कुठून,कशी जन्मते.सत्वशील जगण्याची कविता कशी होत असते.हे ते त्यांच्या 'माझं लक्ष आहे तुझ्याकडे' (पृ. ८५),कविता आहे ती (पृ.११५), समजव एकदा अक्षरांना (पृ.११०,१११) या कवितांमधून खूप छान पद्धतीने सांगतात.ते त्यांच्या 'कुठून येते कविता' या कवितेत म्हणतात.
'कुठून येते कविता? फुलातून... कळ्यातून
की वेदनेच्या मळ्यातून ? भरलेल्या डोळ्यातून की दाटलेल्या गळ्यातून ?'
( पृ.९३)
खरंच कविता कुठून येत असेल, तर ती प्रत्येक संवेदनशील माणसाला जीवन जगत असताना जे जे सलतं,टोचतं काहीतरी वेगळं दिसतं तिथून तिथून कविता जन्माला येत असते.त्यासाठी असावे लागते फक्त संवेदनशील मन.या कवितासंग्रहात तुकाराम,विठ्ठल, ज्ञानेश्वर,पांडुरंग, यशोदा यांच्या संदर्भानेही कविता आलेल्या आहेत. कवी आपल्या लाडक्या विठ्ठलाला लडिवाळपणे हक्काने भांडतो. त्याला विटेवर उभा राहून तू काय पराक्रम केला आहेस.असे विचारतो.इथे शेतकरी त्याच्या कुटुंबासाठी कशा पद्धतीने दिनरात कष्ट करून.मुलांचे शिक्षण,लग्न अशा अनेक समस्यांना सामोरे जातो आणि विठ्ठला तू फक्त कमरेवर हात ठेवून उभा आहेस. शेतकऱ्यांसारखं जीवन जर तू जगून दाखवलेस.तर विठ्ठला मी तुझे टाळ कुटीन असे आबासाहेब पाटील विठ्ठलाला पुढील शब्दात सांगतात.
'जमवून दाव
अशी उलाढाल
तेव्हा तुझा टाळ
कुटेन मी '
( पृ.१३८)
या संग्रहातील कवितांमधून अनेक प्रतिमा,प्रतीक आलेले आहेत.जसे की,भात झाकण सारून नजर टाकतो (पृ.२५), पंकचर झालेली रसिकता ( पृ. ६४), दावी कापून सोडून दिलेल्या इच्छा, आकांक्षाचं प्रेत (पृ. ८९), श्वासाचे आटलेले तळे ( पृ.७०)
एकंदरीतच माणसाला माणुसकीच्या, माणुसपणाच्या घामाची ओल धरून ठेवायला ही कविता शिकवते.
कवितासंग्रह -
घामाची ओल धरून
कवी- आबासाहेब पाटील
प्रकाशक-
शब्द शिवार प्रकाशन, मंगळवेढा,जि.सोलापूर
मूल्य-२०० ₹
पृष्ठ -१४४
प्रथम आवृत्ती- २ एप्रिल २०२२
शरद ठाकर
सेलू जि परभणी
८२७५३३६६७५