एकूण पृष्ठदृश्ये

नमस्कार आपलं या वेबसाईटवर स्वागत आहे

२५ जून २०२३

उपेक्षितांच्या अंतर्मनाचा तळ शोधत माणसाला माणूसपण शिकवणारी नदीष्ट

 

"उपेक्षितांच्या अंतर्मनाचा तळ शोधत माणसाला माणूसपण शिकवणारी नदीष्ट"

     

 मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणीच्या j'अक्षर भेट' या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिकांची लेखनामागील भूमिका आणि साहित्यकृतीवर चर्चा घडवून आणल्या जाते. त्या कार्यक्रमात नदीष्ट ह्या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया स्वतः मनोज बोरगावकर उलगडून दाखवणार होते.

कोरोना काळात अनेक ऑनलाईन कार्यक्रम ऐकले परंतु नदीष्ट विषयी मनोज बोरगावकर बोलत असताना नित्यनेमाने नदीच्या परिसरात घडणाऱ्या अनेक घटना,घडामोडी स्वतः जगणारा उपेक्षित जीवन जगणाऱ्यांना आपलस करून बोलत करणारा हा माणूस अफलातूनच वाटला.निर्मितीप्रक्रिया सांगताना ते स्वतः जगलेल सांगत होते म्हणून  तो आभासी संवादही जिवंत वाटत होता आणि म्हणून मला नदीष्ट मूळातून वाचण्याचीmm उbत्सुकता लागून राहिली होती.मी नदीष्ट मागवली आणि झपाटून गेल्यासारखी वाचून काढली.

  ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेली नदीष्टची ही तिसरी आवृत्ती असून नयन बाराहाते यांनी नदीष्टला साजेसे मुखपृष्ठ आणि मधे मधे सुंदर रेखाटनं केलेली आहेत.

    नदी जशी कुठलीही अपेक्षा न ठेवता वाहत राहते.तशाच पद्धतीने नदीष्ट मध्ये आपल्याला समाजाने उपेक्षित ठरवलेले, उपेक्षित जीवन जगणारे बामनवाडा,सकिनाबी, कालू भैय्या,सगुणा,मालाडी, दादाराव,भिकाजी ही माणसं भेटत राहतात.उपेक्षित असूनही माणसाने माणसांशी कस माणसासारखं वागल पाहिजे.हेच त्यांच्या वागण्या-बोलण्यातून शिकवून जातात.

  सकीना भिकारीन असूनही नदीवर झालेल्या जुजबी भेटीमुळे रेल्वे स्टेशनवर ओळखीशी इमान राखून लेखकाला चोरांपासून वाचवण्याचा प्रयत्न करते तेव्हा भिकारीन असूनही तिच्यातल्या माणुसकीच्या दर्शनाने ती खऱ्या अर्थाने श्रीमंत ठरते.

  नदीकिनारी चिंचेच्या झाडाखाली हरणाच्या कळपाला माकडे फांद्या हलवून चिंच आणि पाला खाऊ घालत होते.अर्थात त्यांच्यावर एक प्रकारचा परोपकारच करत होते आणि ही परोपकाराची ही भावना त्यांच्याकडूनच आपल्यात वाहत आली असावी असे म्हणत असतानाच. माणूस किती स्वार्थी वृत्तीने वागतो आहे हे सांगताना ते म्हणतात.

" दाटून येणाऱ्या अंधारातही माकडांनी हरणावर केलेल्या परोपकाराच्या उजेडाचा तुकडा सोबत घेऊन मी अंधार तुडवत मंदिराकडे निघालो घाटावरच्या ट्यूबच्या तीव्र प्रकाशात तो खालून आणलेला उजेडाचा तुकडा केव्हा हरवून गेला हे कळलेच नाही."अशा प्रकारे परोपकाराची वृती माणसाने सहज हरवून टाकलेली आहे. 

  नदीवर मासे पकडून कुटुंबाचा चरितार्थ चालवणारा पुरभाजी बामनवाड त्याच्यासमोर नदीवर टवाळखोर पोर जेव्हा आंघोळ करणाऱ्या बाईवर अत्याचार करतात.तेव्हा तो काही करू शकत नाही.प्रतिकार करावा तर त्याचा जीव घेणारी पोर पाहून गप्प बसणारा बामनवाड दोन महिने नदीकडे फिरकला सुद्धा नाही. त्या बाईची अवस्था पाहून तो म्हणतो, "त्या दिवशी तिच्या डोळ्यातल्या पान्या परीस,नदीचं पाणी मला कमजोर वाटलं" स्वत:च्या जीवाला खाणा-या बामनवाडने

दोन महिने त्याचे कुटुंब कसे चालवले असेल तर असो, पण बाईला मन मोकळं करण्यासाठी असं कोणतंच हक्काचं ठिकाण भेटत नाही.जिथ हक्काने विश्वासाने आपल्या मनातलं दुःख ती सांगू शकेल,असे हक्काचे विश्वासाचे खांदे तयार व्हावेत.असे लेखकाला वाटते आणि ते होणे आवश्यक आहे.

   नदीच्या पुरामुळे झालेले नुकसान पाहून कालू भैय्या नदीला उद्देशून म्हणतो,"आपने माँ ये नाम को बट्टा लगाया उसने!" तेव्हा दादाराव कालु भैय्याला सांगतो ते जसं काही नदीच्या मनातल्या भावना तो बोलून दाखवतो.नदीचा महापूर म्हणजे तिची भडास आहे असं सांगतो माणसाला जसं कोणासमोर तरी हक्काच्या ठिकाणी मन मोकळ करायच असत तसच नदी महापुराच्या रूपाने आपलं मन मोकळं करत असते.अगदी आडदांड मुलाच्या कानफटात मारतानाही त्याला इजा होण्यापेक्षा तो सुधारावा अशी भावना असते, अगदी तशीच भावना महापूरातल्या नदीची असते.तिला जीवन उद्ध्वस्त करायचे नसते तर पुनरुज्जीवन करायचे असते. नदी वाहती राहिली तरच सर्व जीवन वाहते राहील,नदी स्वतःच्या अस्तित्वासाठी नाही तर माणसाच्या अस्तित्वासाठी झगडत आहे.हे ध्यानात आणून देणारा दादाराव पुराने सर्वस्व धुवून नेल असल तरी आपल्या जवळ असलेल नाण नदीत टाकून कृतज्ञ होणारा दादाराव.जगाला सकारात्मक पद्धतीने नदीकडे पाहण्याची दृष्टी देणारा दादाराव महत्त्वाचा वाटतो.वृक्षतोड,वाळू,

मातीचा उपसा याद्वारे नदीची लूट करणाऱ्या मतलबी माणसाला दादाराव नदीकडे सकारात्मक पद्धतीने पाहायला भाग पाडतो.

     नदीष्ट मध्ये आणखी एक व्यक्ती आपल्या मनाचा ठाव घेते आणि विचार करायला भाग पाडते.ती म्हणजे भिकाजी. मांजरा बद्दल मनात प्रचंड राग असलेल्या भिकाजी कडून अनावधानाने दारूच्या नशेत मांजर समजून स्वतःच्या मुलीलाच फेकून भिंतीवर मारल्यामुळे भिका-याच जीवन जगावे लागत असलेला भिकाजी.नक्कीच स्वतःची मुलगी मारण्या एवढा क्रुर नाही,परंतु नकळतपणे घडलेल्या त्या क्रुर घटनेमुळे तो भोगत असलेल दुःख हे जगाला सांगू शकत नाही;परंतु लेखक नदीचा तळ

शोधण्यात जसे पारंगत आहेत त्याच पद्धतीने भिकार्‍याच जीवन जगणार्‍या भिकाजीच्या मनाचा ठाव घेण निश्चितच एवढं सोपं नाही.त्यासाठी लेखक स्वतः भिकाजीच्या डब्यातील पदार्थ खातात आणि स्वतःचा डबा भिकाजीला देतात अशा एक ना अनेक प्रसंगातून लेखकाच वंचित समजल्या जाणाऱ्या माणसांना आपलस करण त्या अबोल लोकांना मन मोकळं करायला हक्काची जागा देऊन.वंचितां मध्ये असलेल संवेदनशील मन दाखवून दिलेले आहे. वंचितांच्या मनातला संवेदनशीलपणा, चांगुलपणा, प्रेम प्रदर्शित करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. 

 भिकाजीचाच विचार केला तर वरडोळे माशांना रोज लंगर मधील भाकरी कुसकरून टाकणं. स्वतः भीक मागून जमवलेले पैसेही जुजबी ओळख असलेल्या गब्दुल्या कॉन्ट्रॅक्टरला 275 पैकी फक्त पाच रुपये ठेवून 270 रुपये देणे. किडनी फेल झालेल्या मुलाच्या बापाने किडनी द्यायची विचारणा केली की लगेच किडनीही द्यायला तयार होणं,

दारूचा वास येईल म्हणून मुलीचा पापा न घेणारा माणूस कसा असंवेदनशील असू शकतो हे वाचकालाही पटायला लागतं.

   नदीष्ट वाचत असताना सगुणा हे तृतीयपंथी पात्र मेंदूला झिणझिण्या आणणारा प्रश्न करत.

"नजरे चुरानेवाले तुम..और हिजडे हम.. वारे व्वा.. सच्ची बता,आँख मे आँख डालके देखनेवाला हिजडा की नजर चुरानेवाला हिजडा? आँख चुरानेवाला हिजडा हुआ नारे !"

   नदीष्ट वाचत राहताना हा प्रश्न मनातून काही जात नाही.तो आपल्याला निरूत्तर करतो,परंतु सगुणा तृतीयपंथी जरी असली तरी मनाने कशी संवेदनशील आहे.तिच्या वाट्याला हे कशा पद्धतीने आलं.हे नदीष्ट वाचत राहताना आपल्याला तृतीयपंथीयांच जीवन उलगडत रहात.आपण जगत असलेल्या प्रतिष्ठेला कुठलाही धक्का न लागू देता सगुणा कशी वागते.याच वाचकाला अप्रूप वाटायला लागत.

  लेखकाला नदीच एवढ आकर्षण का आहे.हे सांगता येत नाही पण त्यांचे एक तत्वज्ञान आहे. ते म्हणजे जन्माच्या आधी आपण आईच्या गर्भात पाण्यातच होतो ना!आईच्या गर्भाशी नदीला जोडणारे मनोज बोरगावकर पुढे म्हणतात "आपल्याला असलेल्या नदीच्या अनादी आकर्षणाचे कारण आईच्या गर्भाशी तर निगडीत नसेल ना? नदी म्हणजे विस्तारत गेलेले गर्भाशय" काळ,वेळ प्रसंग याचे कुठलेही भान नसलेले मनोज बोरगावकर यांना कालू भैय्या जेव्हा जपून पोहायला सांगतो. तेव्हा ते म्हणतात."ये नदी की कितनी आदत हो गई है ना,माँ की गोद की तरह, बोलो तुम्हीच कालू भैय्या, माँ की गोद मे कुछ धोका हो सकता है क्या?" एवढ नदीशी एकरूप झालेले मनोज बोरगावकर नदीष्ट कसे आहेत हे आपल्याला समजायला लागत.

   नदीष्ट मधील पात्र ही कुठल्यातरी दुःखाने भरून वाहणारी आहेत.त्यांच्या दुखऱ्या आयुष्याकडे कोणीही निकोपदृष्टीने पाहत नाही परंतु लेखक या वंचित माणसाकडे निकोपदृष्टीने पाहून त्यांना आपलंसं करून त्यांच्यातलाच तो जिवाभावाचा होतो म्हणून,एखादी जखम जशी भळभळा वहायला लागते. त्या पद्धतीने ही वंचित माणसं लेखका जवळ आपल दुःख भडभडा बोलून मोकळे होतात.लेखक त्यांना व्यक्त होण्यासाठी हवी असणारी हक्काची जागा निर्माण करून देतो.त्यांना आपला जवळचा वाटतो म्हणून ह्या कादंबरीतील दुखरी,वंचित माणसं मोकळेपणाने बोलायला लागतात.

   एखाद्या माणसाला कशाचा नाद,छंद असल्यास आपण जसे नादीष्ट माणूस आहे म्हणतो, तसे मनोज बोरगावकर हे नदीष्ट माणूस आहेत.एखाद्या जखमेतील दु:ख जोपर्यंत बाहेर पडत नाही. तोपर्यंत ती जशी ठसठसत रहाते,ती ठसठस,तो त्रास मनोज बोरगावकर यांना नदी किनारी भेटणा-या दु:खी माणसाला बोलतं करे पर्यंत त्यांना चैन पडत नाही.त्यांना बोलत करे पर्यंत ते बेचैन असतात.जेव्हा त्या दु:खी माणसाला आपलस करून त्यांचे दु:खाने ठसठसणारे मन हळुवारपणे बोलत करून त्याला दु:ख मुक्त करतात.तेव्हाच मनोज बोरगावकर यांना चैन पडते.हे नादीष्टपण आणि नदीष्टपण त्यांच्यात कायम रहावो.ते तुमच्यात माझ्यात येवो आणि ही माणुसकीची नदी अखंड अशीच वहाती रहावो.

   नदी किनार्‍याने अनेक संस्कृतीचा विकास झाला.अनेक नगर,नागरी वस्ती, वसाहती नदीच्या प्रदेशात वाढत राहिल्या नदी अनादि काळापासून अखंड स्वतः दुःख भोगत आपल्याला समृद्ध करत वाहत आहे.अनेक बाया माणस अशी आहेत ज्यांना दुःख हलकं करण्यासाठी नदी आपली वाटते आणि अगदी तसेच मनोज बोरगावकर यांनी स्वतःनदी होऊन नदीष्ट मधील काळजी घेणारा कालू भैय्या,बामनवाड,दादाराव,पुजारी, प्रसाद,सकिनाबी, मालाडी,मीनासाब,सगुणा,भिकाजी या वंचित माणसांना बोलतं करण्यासाठी समाजाचा विचार न करता मन मोकळं करायला हक्काची जागा उपलब्ध करून दिली.नदीष्ट मध्ये ख-या अर्थाने अपेक्षितांच्या अंतर्मनाचा तळ शोधत माणसाला माणूसपण शिकवण्याच काम नदीष्टच्या माध्यमातून केलेलं आहे.नदी जशी वाहत राहिली की, तिच पाणी शुद्ध होत जात तशाच पद्धतीने माणसांनी आपल्यातले राग,लोभ, अहंकार,मत्सर विसरून अहंकाराच ओझ डोक्यावरून उतरवल तर नक्कीच आनंद वाटणारी आनंदाची ही नदी वहाती राहील यासाठी आपणही नदीष्ट होवू या. 

         नामवंत अनुवादक चंद्रकांत पोकळे यांनी   

नदीष्टचा कन्नड भाषेत अनुवाद केला आहे.नदीष्ट अशीच अनेक भाषांमधून जगभर वाहत राहो याच शुभेच्छा.


कादंबरी- नदीष्ट

लेखक- मनोज बोरगावकर 

प्रकाशन - ग्रंथाली, मुंबई 

मूल्य- दोनशे रुपये


  शरद ठाकर 

सेलू जि.परभणी

८२७५३३६६७५


१३ जून २०२३

संवेदनशीलतेचा उजेड पेरणाऱ्या काळोखाच्या कविता


"संवेदनशीलतेचा उजेड पेरणाऱ्या काळोखाच्या कविता"

 

'काळोखाच्या कविताहा कवी नामदेव कोळी यांचा वर्णमुद्रा प्रकाशन,शेगाव यांनी प्रकाशित केलेला कवितासंग्रह असून,मुखपृष्ठ राजू बाविस्कर यांचे तर आतील बोलकी रेखाटने जितेंद्र साळुंखे यांचे आहेत.डॉ.भरतसिंग पाटील यांच्या प्रदीर्घ प्रस्ताविकेतून कवितासंग्रहाचा परिचय होतो.

        साधूचे कूळ आणि नदीचे मूळ पुसू नये असे म्हणतात त्याप्रमाणे कवी त्यापुढे जाऊन काळोखाचे गूढ पुसू नये असे म्हणतो.हा दुःखाचा वेदनेचा काळोख सर्वांच्याच वाटेला आलेला असतो. दुःखाच्या काळोखाची सल मनात असते म्हणूनच कवितेचा अर्थात 'काळोखाच्या कवितेचाजन्म होतो.आणि या कवितेच्या माध्यमातून कवी उजेडाची तिरीप होऊन जातो. 

 "अस्वस्थता पोखरते माझं सबंध शरीर 

मन मेंदू पेशीपेशी 

एक उजेड चालत येतो माझ्या दिशेने विलीन होतो माझ्यात 

मी उजेडाची एक तिरीप"

   ( उजेडाची एक तिरीप पृ.१६) 

     दुःखाचा हा काळोख सरावा म्हणून जो तो प्रयत्न करत असतोपण काही लोक अडचणीच्या दुःखाच्या काळात आपल्या म्हणवणाऱ्यां सोबत राहतात आणि उजेडाची तिरीप येताच सर्वांना सोडून भूतकाळ विसरून पुढे जातात.परंतु या काळोखाच्या कवितांमधून आपल्याला खऱ्या अर्थाने कवी आपल्या कवितेतून त्यांच्या माय बापा विषयी कसे संवेदनशील आहेत हे प्रकर्षाने जाणवते आणि या कविता काळोखाच्या जरी असल्या तरी वाचकाच्या मनात त्या हळुवारपणे संवेदनशीलतेचा उजेड पेरण्याचे काम करतात.

    काळोखाच्या कविता हा कवितासंग्रह कवीच्या काळोख्या आयुष्यात चैतन्याचा उजेड पेरणाऱ्या वासंतीताई आणि बाबांना अर्पण केलेला आहे. प्रिय वासंतीताईस ह्या  कवितेतून  ताई म्हणजे जणू आईचे दुसरे रूपच.आईची जशी लेकरावर माया असते त्याच प्रमाणे ताईही आपल्या भावासाठी पडेल ती काम करतेकष्ट करते कठीण परिस्थितीमुळे शिक्षणाचा खर्च झेपत नाही म्हणून स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडून भावाच शिक्षण पूर्ण झालं पाहिजे,भाऊ शिकला पाहिजे त्याच्या आयुष्यातील काळोख कमी झाला पाहिजे. ही तिची भावना असते. प्रिय वासंतीताईस या कवितेत मला माझ्यासाठी शिक्षण अर्धवट सोडणारी माझी ताई मला दिसते. भावाच्या  आयुष्यात उजेड पेरण्यासाठी उन्हातान्हात खपून मेहनतीची काम करूनगुरंढोरं सांभाळणारी गवताचे भारे कापणारी,खुरपणाच्या तासाला सगळ्यात पुढे असणारी बहिण-भावाला प्रेमाचा सल्ला पुढील शब्दात देते.

 "गह्यरा मोठ्ठा मानूस बनजो

आपल्याले कमी लेखनारांच्या

नाकातले केसं बाय्जो

गरिबाले हलकी वडांग समजनारांले दाखोई देजो 

एक ढोरक्याचा पो-याबी शिकी सवरीसन घरदार पुढे नेवू शक्तो

   (प्रिय वासंतीताईस,पृ.५४ )

पण दुःखाची गोष्ट हीच की,काळोखाचे दिवस पालटलेले असतांना हे सुख पाहायला काळोख दूर सारणारी उजेड पेरणारी ताई आज नाही.

     अभावग्रस्त वातावरणातही माय कशी परिस्थितीशी दोन हात करते.नेटाने जगण्याची अन् कुटुंब जगवण्याची लढाई कशी हिंमतीने लढते हे सांगताना कवी म्हणतात.

"कित्येक पावसाळे गेले

 पण 

थेंबांशी झुंजणारी माय

मात्र कधी थकली नाही"

   ( अथक,पृ.२१)

 थकनं कुढणं हे मायीला माहीतच नाहीसकाळी उठल्यापासून हात चलताच असतो.रामपहारी उठली की सडा-सारवण करणं,गोठ्यातील शेण काढणं,स्वयंपाक करणं,धुणीभांडी करणं,शेतात जाणंशेतातून आलं की पुन्हा चुलीला लागायचं  स्वयंपाक करायचा,चिल्यापिल्यांना खाऊ घालायचं,खरकटी भांडीकुंडी करून उद्याची चिंता करत झोपायचं.ही नित्याची लढाई माय कशी लढते हे पुढील शब्दात सांगितले आहे.

"तिन्ही सांजेची लढाई  

चुलीतल्या निख-याशी

जन्मभराची टक्कर

दुनियेच्या पसा-याशी"

(जीव खोल खोल डोह,पृ.२५)

  या काळोखी दुनियेशी टक्कर देत असताना माय जुने लोकसंकेत,श्रद्धा-अंधश्रद्धा सर्व बाजूला सारून अमावसेच्या दिवशी लेकराला आवडणारी उडदाची डाळ शिजवते.परिस्थितीशी दोन हात करते,परंतु मुलगा जेव्हा शहरात जायला निघतो.तेव्हा ती हळवी होते.

निघालो तेव्हा घर रिकामं रिकामं धुरानं माखलेलं

तिच्या डोळ्यात आभाळ भरून आलेलं

     (आभाळ पृ.२८)

     ज्यांनी शिक्षण नोकरीच्या निमित्ताने घर सोडलेलं असतं त्यांनी हे आभाळ भरून येणं अनुभवलेलं असतं.

   'मायनं कविता केली असती तरह्या कवितेत मायन कविता कशावर केली नसती हे कवितेतून मांडतानाच तिला नियतिवर कविता लिहायची असेल असे म्हणतात.निश्चितच मायने रडत कुढत बसणारी,दु:ख सांगणारी  कविता लिहिली नसती तर मायने नियतीवर कविता लिहिली असती आणि नियतीला ही ठणकावून सांगितले असते तू कितीही निष्ठूरपणे वाग मी तुझ्यावर विजय मिळवणारच.

      माय,अथक,सुखाचं मरण,गवरीची राखजीव खोल खोल डोह,आभाळ,नजरा नजर,चिमणी,मायन कविता केली असती तर ह्या कवितांमधून माय कशी आहे.हे आपल्याला समजून येते.    

        माय जितकी सोशिक नियतीवर विजय मिळवणारी तेवढाच बापही संसाराला हातभार लावणारा आयुष्याच्या शेवटच्या काळातही गुरं ढोरं राखून,   लोकाची रानं बटईन करून कष्ट करणारा.बाप सालभरचा दाळदाना धकावा  याच्यासाठी लोकांच्या वावरात राबतो प्रसंगी स्वतःची जमीन पडीक पडू देतो पण दुस-यांची शेत नेटाने मनलावून बटईने करतो.बटाईने केलेल्या शेतात फायदा होईल,की तोटा हे निसर्ग,बाजार या बेभरवशाच्या जीवावर तो एक प्रकारे शेती बटाईने करून जुगारच खेळत असतो.

 “शेती हा जुगार आहे

 कितीदा अनुभवूनही

बाप घालत असतो उखळात डोकं"

  (बटाई पृ.३३ ) 

कितीही कष्ट झाले तरी काळ्या आईची ओटी भरणे.हे कर्तव्य समजणारा  बाप बेभरवशाची शेती आनंदाने करत राहतो. गुरं ढोरं राखून लोकांची रानं बटईन करूनगुराढोरांना सर्वस्व समजणाऱ्या बापाला जेव्हा ढोरांच्या वाड्यात सुने खुंटे  दिसतात.तेव्हा थकलेला बाप अस्वस्थ होतो.घरात जेव्हा बाप असतो तेव्हा बाप कधी कोणाला रागं रागं बोलत नसला तरी  त्याच्या असण्याचा नैतिक धाक असतो.त्यामुळे घरात आई,सुन डोक्यावरचा पदर सारखा सावरत असतात.त्या सोबतच बापाच्या धाकाने  घरात सर्व काही ठीकठाक असतं परंतु बाप गेल्यानंतर घरातला धाकही संपून जातो.ह्या पोरकेपणाचा घरच्यां शिवाय बाकी कोणाला फरक पडणार नसला तरी बाप गेल्यानंतर काय झालं आहे. ते पुढील शब्दात सांगतात. 

"सुनी पडली नदीची वाट

पोरकी झालीत गावातील गुरं-ढोरं  

दिसली नाही दिवटी लव्हाळीच्या नागफणांची

दिवाईची गाणीकितीतरी लोककथा

सोबत घेवून गेला बाप 

याचा कुणालाच नाही पडला फरक"

  ( धाक पृ.६६)

 

        ढोरांशी बनलय बापाचं नातं,

पडीक,बटाई,पोरकंपण,ठिबक,सुने खुंटे,बेलगाम,धाक ह्या कवितांमधून नामदेव कोळी यांनी शेतकरी कष्टकरी बाप उभा केला आहे. 

       पुढे माय-बापाच्या दोघांच्या कविता आहेत.'लवकरच पाऊस येईल म्हणून 'या कवितेतून दुस-यांच्या आनंदात आनंद शोधणारे माय बाप भेटतात.पखांचे मुंगळे दिसले की माय सुखावते कारण मायीला माहित आहे. पखांचे मुंगळे निघाले म्हणजे आता लवकरच पाऊस पडणार आणि सगळीकडे समृद्धी येणार म्हणून आनंदून जाणारी माय अन् शेतात गायी वासरांच उड्या मारणंचिमण्यांची धुळांघोळ,मोरांचा नाच पाहून बापही आनंदी होतो.दुस-याच्या आनंदात आनंद पाहिला की घरही आनंदून जाते.

  थकलेल्या मायबापाची कविता मध्ये बाप सकाळ पासून फाटक्या कपड्यानिशी ढोरं घेऊन रानात जातो आणि माय अनवाणी पावलांनी दूरवरच्या रानात जाते दोघंही कष्ट करतात,बाप सांधेदुखी घेऊन तर माय पायांत कुरपं घेऊन परतते अन् कवी शहरातल्या मुलांना थकलेल्या माय बापाची कविता शिकवून परततो.या कवीते मधून  कवीची आपल्या माय-बापाला म्हातारपणी कष्ट करावे लागतात या बद्दल अपराधीपणाची भावना दिसून येते.माय बापाला शेतात मदत करावी की शहरात काम कराव ह्या प्रश्नांच मोहळ सारखं कवीच्या डोक्यात असतं. प्रगती करायची तर गाव सोडावं लागत,शहरात जावं लागत,तिथेही प्रयत्न करत राहून मेहनत करावी लागते,पण पैसा,प्रगती,प्रतिष्ठा यासाठी हे सगळं करावच लागत.

"माय माती माणसं

ओढून नेतात गावात

पैसा प्रगती प्रतिष्ठा

झुलवत ठेवते शहरात"

   (प्रश्नांच मोहळ पृ.१५)

     'ही कुठली दहशत?' या कवितेतून शेतमजूरांना उन्हातान्हात कष्ट करून कामाचे दाम मागायला शेत मालकाला घाबरत घाबरत पैसे मागावे

लागतात.शेतमजूरांच्या मनातली शेतमालका बद्दल ची दहशत या कवितेतून दिसून येते.बाप जेव्हा पोरग शिकावं म्हणून पाटलाची खंडीभर ढोरं फुकट सांभाळतो. मास्तरान पोराला चांगलं शिकवावं म्हणून माय मास्तराला दाळदाना देते अन् शेवटी पोरग शिकून पाटलाचा आणि मास्तराचा त्यांच्याकडे किती पैसा शिल्लक राहिला हा हिशोब माय बापाला सांगतो.तेव्हा आपल शोषण झालं,पण लेकरू शिकल्यामुळे आता त्याचं कोणीही शोषण करू शकणार नाही.याचा आनंद पुढील ओळीत व्यक्त केला आहे.

 “अक्षर शून्य माय बापाला

हिशोबातल कवडी इतकंही कळत नाही

पण पोराला हिशोब येतो 

याचा आनंद आभाळात मावत नाही"

      (हिशोब पृ.४५)

   ज्या विळ्याच्या जोरावर बापाने ह्या काळोखाला चिरलं त्या विळ्याशी जन्मभराच नातं आहे.कारण विळ्याच्याच मदतीने मायने लेकरांच्या नाळी कापल्या,आपल्या गुरांसाठी चारा कापला,जनावरांची शिंग साळली प्रत्येक ठिकाणी मदतीला येणाऱ्या विळ्याला

बापानं धार लावली अनेक काम घेऊन हातावेगळी केली.जगण्याची लढाई लढली परंतु आता विळ्यासह घराला धार लावणारे आणि काळोखाला चिरणारे बाबा नसल्याने मायीचेही हात बोथट झाले आहेत.

अशाप्रकारे थकलेल्या माय बापाची कविता,ही कुठली दहशत,हिशोब,विळासमुद्र न पाहिलेला माणूस,सलाईनससा रे ससा,गणगोत या कवितांमधून माय बापाचे  दर्शन होते .

     शेतमजूर या कवितेतून शेतमजूरांचे हाल मांडतानाच तत्रैव ही कविता शेतमजुरांचे मन पिळवटून टाकणारे प्रश्न आपल्या समोर अधोरेखित करते. 

घरोबा,मजबूरी,शेतमजुराच्या पोरी या कवितांमधून शेतमजुरांचे शोषण त्यांची होणारी कुचंबना दिसून येते. त्यांच्या वाट्याला आलेले हे परंपरेने आले आहे. म्हणून ते त्याच मार्गाने चालत राहतात त्यामुळे शेतमजुरांच शोषण होतच राहते त्यांना सर्वकाही सहन करावं लागतं. परिस्थितीमुळे ते स्वीकारावं लागतं.हे पुढील ओळीत मांडलेले आहे

"शेतमजुराच्या पोरी गरीब गायी

बिनबोभाट आपलासा करतात अनोळखी खुंटा

स्विकारतात आपल्या वाटेचा भोगवटा

रात्रीचा दिवस करत भोगतात आपली जन्मठेप"

    (शेतमजुराच्या पोरी पृ.५१)

   शेतकरी शेतमजुरांचं हे अख्ख गावच सरकारी दवाखान्यात वेगवेगळ्या समस्यांनी भरती झाला आहे.गावातल्या प्रत्येकालाच कुठलं तरी दुखन झालेलं आहे.

"गरिबाला आजाराला नापिकीला कंटाळून

मरून पडलंय अवघं गाव शवागारात

शहरातल्या सरकारी दवाखान्यात"

      (सरकारी दवाखाना पृ.५६)

     अशा शब्दात गावाचं दुःख मांडलेल आहे.त्यापेक्षा शहरात जाऊन पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी गाव सोडून लोक चालली आहेत.

खेड्यापाड्यात टी.व्ही.,मोबाइल पोहोचला पण भुकेचा प्रश्न सुटला नाही.म्हणून बरेच लोक गाव सोडून निघून चालले आहेतपण काही अंधश्रद्धाळू लोक गाव ओसाड झालं तर लक्ष्मी कोपेल म्हणून गाव सोडायला तयार नाहीत.जुन्या वाड्याच्या भिंतीवर पिंपळाचे झाड वाढावं तसं मोठ्या उमेदीने शेतात राबून कष्ट करणाऱ्या शेतकरी,शेतमजुरांमुळेच गावाला गावपण टिकून आहे.हे पुढील ओळीतून स्पष्ट होते. "कित्येक पिढ्यांपासून

गावाला चिकटलीयत ही माणसं

कराडीवर मुळ्या रोवत

उमेदीन वाढणाऱ्या झाडांसारखी

  (भंगतीचा पाय पृ.६८)

    एकंदरीतच काळोखाच्या कविता मधून माय,बाप,माय-बाप,शेतकरी शेतमजूर,गाव,गावकरी अन् शहरातील कष्टप्रद जगण्यातूनही जगण्याकडे सकारात्मकपणे पहायला मिळते.

 

कवितासंग्रह - काळोखाच्या कविता

कवी-नामदेव कोळी

प्रकाशन- वर्णमुद्रा प्रकाशनशेगाव.

मूल्य -२५० 

 

  शरद ठाकर 

८२७५३३६६७५

सेलू जि परभणी

 


१० जून २०२३

प्रेमासह सामाजिक आणि नैतिक भान देणाऱ्या 'कविता : विशीतल्या आणि मिशीतल्या'

 प्रेमासह सामाजिक आणि नैतिक भान देणाऱ्या 'कविता : विशीतल्या आणि मिशीतल्या'



'कविता विशीतल्या आणि मिशीतल्या ' हा मधुकर जाधव यांचा कवितासंग्रह शीर्षकापासूनच आकर्षणाचा विषय वाटतो. या संग्रहात एकूण ७१ कविता असून, या कविता दोन भागात विभागलेल्या आहेत.पहिल्या भागात शीर्षका प्रमाणेच विशीतल्या कविता आहेत. काव्यलेखनाची सुरुवात बहुतेक करून तारुण्याच्या काळात होते आणि त्या तारुण्याच्या काळात कवीचे आकलन, त्याचे रुचीचे विषय यानुसार कविता लेखन व कवितेचे विषय त्या कवितेतून येत असतात, पण तारुण्यात काव्य लेखन करणारे बहुतेक कवी प्रेम कवितेपासून काव्यलेखन करतात. विशीतला काळ हा कोणावर तरी प्रेम करण्याचा, झुरण्याचा असतो. त्याप्रमाणे मधुकर जाधव यांनी पहिल्या भागात प्रेमकविता घेतलेल्या आहेत. कवीही माणूस असतो. माणूस म्हटला की तोही कोणावर तरी प्रेम करतो. परंतु कोण काय म्हणेल म्हणून बरेच कवी प्रेम कवितेला आपल्या कवितासंग्रहात जागा देत नाहीत. परंतु मधुकर जाधव यांनी प्रेम कवितांचाच एक विभाग केलेला आहे. प्रेम म्हणजे वासना, विकार न ठरता प्रेम ही एक निकोप, निरागस भावना असली पाहिजे. प्रेम फक्त प्रियकर प्रेयसीचेच असते अशातली गोष्ट नाही. तर जीवनात प्रेम करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. ज्यावर आपण प्रेम करावे, पण तसे होताना दिसत नाही. उगाचच कुणावर एकतर्फी प्रेम करणे चुकीचेच आहे. प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे.

प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असू शकते, म्हणून मला जे आवडते. ते प्रत्येकालाच आवडेल ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.त्यातून अपेक्षाभंग होऊन नको ते घडते. प्रेमाच्या, विरहाच्या, रुसण्याच्या, फुगण्याच्या, स्वप्नाच्या अनेक कविता विशीतल्या कवितेत आहेत.


            मिशीतल्या कविता या भागातील कविता ह्या प्रेमाच्या रंगीबेरंगी स्वप्निल दुनियेतून बाहेर आल्यानंतर खऱ्या अर्थाने जगणे आणि जीवन काय आहे याचे भान आल्यानंतर, जीवनातले टक्के-टोम्पे खाल्ल्यानंतर जगण्याचे प्रगल्भभान आल्यानंतरच्या कविता ह्या भागात आलेल्या आहेत.आपल्याला कविता बदलली असे वाटत असले, तरी कविता तीच असते.फक्त आपल्या जगण्याचे संदर्भ बदललेले असतात. तारुण्यात प्रेम, प्रौढत्व आले, की घर संसार आणि त्यासोबतच अनेक समस्या अशा बदलामुळे आपल्याला कविता बदललेली वाटते, परंतु कविता तीच असते फक्त त्या कवितेचे विषय आणि आशय मात्र बदललेले असतात. याबद्दल ते म्हणतात.


' कविता कविताच असते

विविध अर्थछटा मांडणारी

आयुष्याचे दुवे सांधणारी

बदलत जातात शब्द, अर्थ

फार तर कवितेचे विषय'


        लोकप्रतिनिधींच्या भूलथापांना, स्वार्थी राजकारणाला आणि त्या स्वार्थी राजकारण्यांच्या आश्वासनांना भुलणाऱ्या मतदारांना ते त्यांच्या कवितेच्या माध्यमातून जागृत करण्याचे काम करतात. कारण कुठलाही पक्ष सत्तेत येईपर्यंत जनतेच्या सोबत असतो. त्याला सर्वसामान्यांबद्दल कळवळा असतो आणि तेच जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा त्यांना कोणाबद्दलही आस्था वाटत नाही. शेतकरी, शेतमजूर यांचे नित्याचे प्रश्न त्यांना सोडवावे वाटत नाहीत, की शेतमालाला हमीभाव मिळवून द्यावा वाटत नाही. गरीबी, बेरोजगारी, खून, स्त्रियांवर होणारे अत्याचार हे थांबवावे असे कोणालाही वाटत नाही. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सत्ता पाहिजे असते आणि ती मिळवण्यासाठी ते नैतिकता, नितीमत्ता, निष्ठा या सर्व गोष्टी गौण ठरवून राजकारणी लोक आपला स्वार्थ साधून घेत असतात, तर सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र नीतिमत्ता, निष्ठेच्या नावाने नको त्या माणसांमागे लागून आपले कामकाज सोडून त्यांच्या मागे भटकत असतात. आपल्या मतलबापुरता गोड बोलणारा, कौतुक करणारा आपला माणूस जेव्हा त्याचा स्वार्थ साधला की बदलतो. तेव्हा सर्वसामान्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे मतदारांनी जागरूकपणे विचार करून निस्वार्थपणे चांगले काम करणाराला मतदान केले पाहिजे. तरच आपली लोकशाही टिकून राहिल हे ते पुढील शब्दात सांगतात.


'मतदारांनो जागरूक राहा 

नका पडू बळी भूलथापांना 

मतदानाचा हक्क बजावून 

वाचवा प्राण लोकशाहीचे'


     या कवितासंग्रहात आई-वडील,आजी यांच्यासह देश प्रेमावरच्याही कविता आहेत. बऱ्याच वेळा काही लोक आपल्या मायबापाने आपल्यासाठी काय करून ठेवले आहे असे विचारत असतात, परंतु त्यांना या गोष्टीची जाणीव नसते, की हा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण मुलगा म्हणून आपल्या माय बापासाठी काय केले आहे. 'जावे त्याच्या वंशा' या कवितेतून बापाचे कठोर वागणे काय आणि कसे असते, त्यांच्या वागण्यातल्या कठोरपणाही का महत्त्वाचा असतो आणि त्या कठोर वागण्यातही आपले हीत कसे आहे हे ते सांगतात. मायबापाने माझ्यासाठी काय केले हे समाजातले लोक विचारत असतील, पण कवी मधुकर जाधव यांना हा प्रश्न विचारणे सयुक्तिक वाटत नाही. कारण समाजातला प्रत्येक मुलगा आदर्श पुत्र म्हणून वागला पाहिजे असे त्यांना वाटते म्हणून ते म्हणतात.


'आज जरी समाज निष्ठूर आहे 

अनैतिकतेचे जिथे काहूर आहे 

दुर्जनांच्या भरलेल्या मैफिलीत 

सज्जन म्हणून जगायचे आहे'


          अशा पध्दतीने प्रत्येकाने स्वत:हून सज्जनासारखे वागायचे ठरवले, तर समाजात वृध्दाश्रम चालवायची वेळ येणार नाही.


        आज आपण दुसऱ्याच्या नावाने खडे फोडतो. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काहीच केले नाही म्हणतो, पण आपण याही गोष्टीचा कधीतरी विचार केला पाहिजे, की माझ्याही कामगिरीचे मूल्यमापन माझ्यानंतर येणारी पिढी करेल तेव्हा मलाही त्यांना उत्तर द्यावे लागेल. या गोष्टीची जाणीव ठेवून प्रत्येकाने वागले तर सर्वांनाच चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही, म्हणून जल, जंगल, जमीन, नैसर्गिक पर्यावरण यांचा व्यवस्थित वापर करून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. तरच येणारी पिढी आपल्याला माफ करेल, एवढेच नाहीतर मानवतेचे,

संस्कारशीलतेचे, प्रेमाचे, आपलेपणाचे, आपुलकीचे जे विविध जाती धर्मातील एकोप्याचे नातेसंबंध आहेत. त्याचा वसा आणि वारसा आपण पुढच्या पिढ्यांना दिला पाहिजे. ज्या पद्धतीने बिजाचे अंकुरात, अंकुराचे रोपात, रोपाचे महावृक्षात रुपांतर होते आणि तो वृक्ष फळं, फुलं, सावली, ऑक्सिजन आणि बरेच काही माणसाला देतो. ही त्या झाडामधील देण्याची वृत्ती, दातृत्वशीलता माणसात उतरावी ही अपेक्षा कवी मधुकर जाधव यांनी केली आहे. ही अपेक्षा म्हणजे जणू आधुनिक पसायदानच म्हणावे लागेल ते म्हणतात.


'बीज, अंकुर, रोपटं, महावृक्ष 

असे निसर्गनियम अबाधित राहो 

ही अपेक्षा आता पिढीजात व्हायला हवी 

सावली देण्याची अंगभूत काला 

माणसालाही अवगत व्हायला हवी'


        माणसाला वरवर सुंदर होण्यासाठी, दिसण्यासाठी ब्युटीपार्लर आहेत. ज्यामध्ये माणसाचे वरवरचे सौंदर्य वाढवता येते. वरवरच्या सौंदर्यापेक्षा माणूस मनातून सुंदर, निरोगी असला पाहिजे यासाठी समाजात ब्युटी पार्लर सारखे माणसाला विचारशील, सुसंस्कारित करणारे 'थॉट पार्लर' निर्माण व्हावेत असे त्यांना वाटते. जागतिकीकरणाच्या झपाट्यात माणूसही बदलत चालला आहे. सोशल मीडियामुळे तर तो अधिकच संकुचित होतो आहे. समोरासमोर भेटणाऱ्या माणसाला बोलायला वेळ नाही, पण ऑनलाईनच्या माध्यमातून एकमेकांबद्दल उगाचच आपलेपणा दाखवला जात आहे. 'युज अँड थ्रो' च्या जमान्यात माणसाचा वापरही 'युज अँड थ्रो' सारखा करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे असे त्यांना वाटते.


शेतकरी, मराठी भाषा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीचा विचार, तरुणाई, विविध प्रवृत्ती, मन अशा काही विषयांवरच्या कविता अभंग छंदातून कवी मधुकर जाधव यांनी उत्तमपणे मांडलेल्या आहेत. मधुकर जाधव अभंग छंद उत्तम प्रकारे हाताळू शकतात.

एकंदरीतच विशीतल्या आणि मिशीतल्या ह्या कविता माणसाला प्रेमाच्या दुनियेची सफर करत सामाजिक आणि नैतिक भान देणाऱ्या कविता आहेत. कवितासंग्रहास

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांची नेटकी पाठराखण लाभलेली असून, चित्रकार अरविंद शेलार यांचे मुखपृष्ठ असून प्रा.प्रशांतकुमार डोंगरदिवे यांची कल्पक रेखाटने आहेत. अशा या सर्वांग सुंदर संग्रहास खूप खूप शुभेच्छा!



कवितासंग्रह - कविता : विशीतल्या आणि मिशीतल्या

कवी - मधुकर बालासाहेब जाधव

प्रकाशन - परिस पब्लिकेशन,सासवड.

पृष्ठ -१२०, मूल्य -१७० ₹


समीक्षक

शरद ठाकर

सेलू, जि.परभणी

८२७५३३६६७५

०६ जून २०२३

मिरगाच्या कविता

 चला साहित्य पंढरीचे वारकरी होऊयात



      सात जून मृग नक्षत्राचे बरसणे....हा भारतीय संस्कृतीचा कणा असलेल्या बळीराजाचा सोहळा....मृग नक्षत्र बरसले तरच शेती चांगल्या पद्धतीने पिकू शकते.मृगाच्या धारा जोपर्यंत बरसत नाहीत, तोपर्यंत शेतकरी आपल्या शेतात पेरणी करू शकत नाही.

बळीराजा म्हणवला जाणारा शेतकरी सुखी राहावा,आनंदात जगावा यासाठी शेतकऱ्याला कोणाच्या,कुठल्याही मदतीची अपेक्षा नाही. त्याला फक्त मृगाचा आरंभ चांगला व्हावा वाटतो‌‌.म्हणूनच शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, परभणी शाखा सेलू व अक्षर प्रतिष्ठान सेलूच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून ' कविता मिरगाच्या ' हा कार्यक्रम सेलू येथे आयोजित केला जातो.

मराठी साहित्याची आवड असणारे,मराठी साहित्यात काही तरी करू वाटणारे,काही मित्र एकत्र येऊन स्वतः पदर मोड करून,कुठल्याही राजकीय व्यक्तीकडून आर्थिक मदत न घेता गेल्या आठ वर्षापासून साहित्यिक,सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या सेलू शहरात ' कविता मिरगाच्या' हा साहित्यिक उपक्रम निखळ,निर्पेक्ष हेतूने आयोजित करतात.

    शब्दसह्याद्री प्रतिष्ठान सेलूचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांच्या मार्गदर्शनात व सेलू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सेलू यांच्या सहकार्याने ह्या  नऊ वर्षांच्या नऊ पायऱ्या चढणे सहजशक्य झाले.

        या बहारदार काव्य मैफिलीत आजपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कवी,कवयित्रींनी हजेरी लावलेली आहे.ज्यामध्ये अभ्यासक्रमातील कवी शंकर कसबे,हनुमंत चांदगुडे,गीतकार डॉ. विनायक पवार, चित्रकार विष्णू थोरे,नारायण पुरी, अविनाश भारती, संजीवनी तडेगावकर, अण्णा जगताप, प्रा. कल्याण कदम,अमृत तेलंग, जितेंद्र लाड, श्रीनिवास म्हस्के, अलका तालनकर, अरविंद सगर,भाग्यश्री केसकर,रवींद्र केसकर, डॉ.मुकुंद राजपंखे, सारिका बकवाड, योगिराज माने,नामदेव कोळी, महेश देशमुख, राजेश रेवले,विठ्ठल चव्हाण,हरीष हातवटे, आत्माराम कुटे,जयश्री सोन्नेकर,शैलजा वसेकर,संतोष नारायणकर, शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, परभणीचे सचिव कवी केशव खटींग असे अनेक मान्यवर कवी 

' कविता मिरगाच्या ' या काव्य मैफलीत सहभागी झाले आहेत.

    शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे हे नववे वर्ष आहे.निर्पेक्षपणे चाललेल्या या साहित्य सोहळ्यास न चुकता मृगाच्या सरीही बरसत असतातच.या  सोहळ्यास रसिक श्रोत्यांनी नक्कीच उपस्थित रहावे.

यावर्षी ई टी.व्ही.  हास्यदरबारसह अनेक टी.व्ही.चॅनल गाजवणारे   कवी,विडंबनकार प्रभाकर साळेगावकर, समाधान इंगळे,संजय बोरूडे,आशा डांगे यांची बहारदार काव्य मैफिल आयोजित करण्यात आली आहे.     

       आयोजकांची कुठलीही लूडबुड नसलेला एखादा उत्तम कार्यक्रम कसा असू शकतो.याचे उत्तम उदाहरण पाहायचे असेल तर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे.

     एक साहित्यिक, शिक्षक,डॉक्टर, इंजिनियर,वकील, व्यावसायिक,राजकारणी म्हणून नाही.तर एक व्यक्ती म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी,सुसंस्कृत राजकारणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जाते त्या महाराष्ट्राच्या शिल्पकार, साहित्यिक यशवंतराव चव्हाण यांच्या सारखे सामान्य श्रोता म्हणून अशा साहित्यिक,सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने हजेरी लावली पाहिजे.

    'कविता मिरगाच्या' या कार्यक्रमातील आपली उपस्थिती स्वतः ला नक्कीच सर्वार्थाने समृद्ध करणारी असणार आहे .

      सात जूनची आतुरतेने वाट पाहणारे अनेक श्रोते सेलूत तयार झालेले आहेत.चला या साहित्य दिंडीत  सहभागी होऊन,या साहित्य पंढरीचे आपणही वारकरी होऊयात.

           

         शरद ठाकर

       ८२७५३३६६७५      

        सेलू जि.परभणी