एकूण पृष्ठदृश्ये

नमस्कार आपलं या वेबसाईटवर स्वागत आहे

२४ सप्टेंबर २०२३

माणसाला माणुसकीच्या 'घामाची ओल धरून' ठेवायला शिकणारी कविता

 माणसाला माणुसकीच्या 'घामाची ओल धरून' ठेवायला शिकणारी कविता 



कवी आबासाहेब पाटील यांनी कवितासंग्रहाला 'घामाची ओल धरून' हे शीर्षक देऊन शेतकरी,कष्टकरी यांच्या श्रमाचा खरा सन्मानच केलेला आहे.शेतकरी शेतात कष्ट करतात,शेत पिकवतात.तेव्हाच माणूस आनंदाने जगू शकतो.शेतकऱ्याच्या कष्टाने,त्याच्या घामाच्या धारांनी शेतात पिक फुलून येते.प्रत्येकाच्या ताटात खायला पुरेसं अन्न मिळते.घामाची ओल धरूनच हे सगळे काही पिकलेले असते. शेतात जसे पीक उगवून यायला पाण्याचा ओलावा असावा लागतो.त्या ओलाव्या शिवाय पीक जगू शकत नाही.हे जरी खरे असले तरी त्या पिकाच्या ओलाव्यासोबतच कष्टणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाची ओल असल्याशिवाय शेतात पीक उगवून येऊ शकत नाही.

     आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डची सक्ती केल्या जाते.जे आधार कार्ड आपल्या प्रत्येक गोष्टीला ऑनलाईनपणे जोडल्या गेलेले आहे.जसे की बँकेचे व्यवहार त्यासोबतच इतर ठिकाणी.त्यावरून एखाद्या माणसाचा व्यवहार कसा आहे‌हे त्या माणसाच्या सीबील वरून ठरवल्या जाते,पण शेतकरी माणसाला सत्वशील जगणे माहीत असते. कष्ट न करता.तो कोणाचा एक रुपयाही घेत नाही.इमानदारीने जगणे एवढेच शेतकऱ्याला माहीत असते.माणुसकीचा धर्म पाळणे हेच शेतकऱ्याला माहीत असते.शेतकरी माणसासाठी कष्ट करतोच,पण त्यासोबतच तो मुक्या जनावरांची, पक्षांची काळजी घेतो.त्याच्यातलं माणूसपण जपत असतो.हे माणूस पण सांगताना ते म्हणतात.

' माणूस या एका क्यूआरकोडवर सापडत होता काळजातल्या ओलाव्याचा तळ

     (पृ.१३२)


दुसऱ्याबद्दल असलेला हा काळजातला ओलावा आता चुकूनही पाहायला मिळत नाही.आज लोक बेगडी वर्तन करून दुसऱ्याबद्दल असलेली आपुलकी दाखवतात. काही तर बोल बच्चन करून काम कमी आणि जाहिरात जास्त करतात. आजच्या काळात अशांची चलती आहे.हे सांगताना आबासाहेब पाटील म्हणतात.

'एरंड्याही खपतात गव्हाच्या दारात फक्त विकणारा ब्रॅण्डेड पाहिजे 

अन् त्याच्या शब्दांवर 

चोवीस कॅरेटचा होलमार्क

       (पृ.४६)

आशा या स्वार्थी जगात शेतकरी कष्टकऱ्यांचे जीवन विषयक वेगळे तत्त्वज्ञान ठरलेले असते.त्यांचे त्यांचे वेगळे समजूतशास्त्र असते.कष्टकरी माणूस आपल्यामुळे कोणाला त्रास नको,म्हणून पोटाला चिमटा देत,आहे त्या परिस्थितीत दुःखातही दुःखाची जाहिरात न करता आपल्या वाट्याला आलेले दुःख.तो निमुटपणे सहन करत आनंदाने जगत असतो. त्याच्यासारखीच त्याला खंबीर साथ देणारी त्याची पत्नीही आहे त्या परिस्थितीत कुरकुर न करता शेतकऱ्याचा संसार सुखाचा करून दाखवते.कारण त्यांच्यामध्ये एक वेगळी समाज आलेली असते. त्याबद्दल ते म्हणतात.

'कितीही चांगलं खाल्लं तरी 

पोटात होत नाही सोनं

हे या लोकांचं समजूतशास्त्र 

जे सोपं करतं अवघड जिणं'

      ( पृ.९२ )


आणि ज्यांचे घर पैशाने भरलेले आहेत.ते व्यापारी,कृषी केंद्रवाले लोक निष्ठेने शेती करणाऱ्या,आपल्या कृषीकेंद्रात विश्वासाने येणाऱ्या शेतकऱ्याचा विश्वासघात करून शेतकऱ्याला हिणकस,दर्जाहीन बियाणे आणि औषधांची विक्री करतात.जेव्हा शेतकरी त्याला जगणे असह्य होते.तेव्हा औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला समजते,की कृषीकेंद्रात आता विश्वासघात असा मोफत मिळतो.

या संग्रहातली नातं ही प्रश्नोत्तराच्या संदर्भातली कविता मला खूप आवडली.आजच्या व्यवस्थेला जर कोणी प्रश्न विचारायला लागला,तर त्याचं काय होतं. प्रश्न विचारणाराला कशा कशा पद्धतीने थांबवता येईल किंवा तो प्रश्न विचारणारा प्रश्न विचारायला जिवंतच राहिला नाही पाहिजे.अशा पद्धतीची व्यवस्था असते. सर्वसामान्याला वाटते,आपण व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे आणि व्यवस्थेने त्या प्रश्नाला समर्पक उत्तर दिले पाहिजे,पण व्यवस्थेला हे मान्य नसते.म्हणून व्यवस्था काय करते हे ती पुढील शब्द सांगतात.

'प्रश्नांच्या नाकात ओवतात व्यसन व्यसनीला बांधतात दावं 

जेणेकरून प्रश्न निमूट थांबतात उत्तराच्या दावणीला'

        ( पृ.९९)


प्रश्न विचारणारालाच, प्रश्नालाच जर उत्तरांच्या दावणीला असे बांधले तर प्रश्न विचारणारा तयारच होणार नाही आणि मग उत्तरे तोऱ्यात आनंदाने राहू शकतात‌.असा हा सध्याचा काळ आहे.     

      कविता कुठून,कशी जन्मते.सत्वशील जगण्याची कविता कशी होत असते.हे ते त्यांच्या 'माझं लक्ष आहे तुझ्याकडे' (पृ. ८५),कविता आहे ती (पृ.११५), समजव एकदा अक्षरांना (पृ.११०,१११) या कवितांमधून खूप छान पद्धतीने सांगतात.ते त्यांच्या 'कुठून येते कविता' या कवितेत म्हणतात.

'कुठून येते कविता? फुलातून... कळ्यातून 

की वेदनेच्या मळ्यातून ? भरलेल्या डोळ्यातून की दाटलेल्या गळ्यातून ?'

     ( पृ.९३)


खरंच कविता कुठून येत असेल, तर ती प्रत्येक संवेदनशील माणसाला जीवन जगत असताना जे जे सलतं,टोचतं काहीतरी वेगळं दिसतं तिथून तिथून कविता जन्माला येत असते.त्यासाठी असावे लागते फक्त संवेदनशील मन.या कवितासंग्रहात तुकाराम,विठ्ठल, ज्ञानेश्वर,पांडुरंग, यशोदा यांच्या संदर्भानेही कविता आलेल्या आहेत. कवी आपल्या लाडक्या विठ्ठलाला लडिवाळपणे हक्काने भांडतो. त्याला विटेवर उभा राहून तू काय पराक्रम केला आहेस.असे विचारतो.इथे शेतकरी त्याच्या कुटुंबासाठी कशा पद्धतीने दिनरात कष्ट करून.मुलांचे शिक्षण,लग्न अशा अनेक समस्यांना सामोरे जातो आणि विठ्ठला तू फक्त कमरेवर हात ठेवून उभा आहेस. शेतकऱ्यांसारखं जीवन जर तू जगून दाखवलेस.तर विठ्ठला मी तुझे टाळ कुटीन असे आबासाहेब पाटील विठ्ठलाला पुढील शब्दात सांगतात.

'जमवून दाव 

अशी उलाढाल 

तेव्हा तुझा टाळ 

कुटेन मी '

   ( पृ.१३८)


या संग्रहातील कवितांमधून अनेक प्रतिमा,प्रतीक आलेले आहेत.जसे की,भात झाकण सारून नजर टाकतो (पृ.२५), पंकचर झालेली रसिकता ( पृ. ६४), दावी कापून सोडून दिलेल्या इच्छा, आकांक्षाचं प्रेत (पृ. ८९), श्वासाचे आटलेले तळे ( पृ.७०)


  एकंदरीतच माणसाला माणुसकीच्या, माणुसपणाच्या घामाची ओल धरून ठेवायला ही कविता शिकवते‌.



कवितासंग्रह -

घामाची ओल धरून


कवी- आबासाहेब पाटील


प्रकाशक- 

शब्द शिवार प्रकाशन, मंगळवेढा,जि.सोलापूर


मूल्य-२०० ₹


पृष्ठ -१४४


प्रथम आवृत्ती- २ एप्रिल २०२२


    शरद ठाकर 

  सेलू जि परभणी

 ८२७५३३६६७५

न जिंकलेल्या पैजेतला मित्र

 काल पोळ्याच्या निमित्ताने माझ्या माले टाकळी ता.सेलू जि. परभणी या गावी डाॅ. काशिनाथ पल्लेवाड सर,दगडोबा माघाडे सर, नवनाथ गवलवाड सर या मित्रांसह गावाकडे गेलो होतो.माझ्या शेतकरी बापाला, बळीराजाला सुखावणारा पोळा हा सण काल गावात पाऊस पडला म्हणून आनंदात साजरा झाला.
  मला जिथे तिथे मी चहा वगैरे काही घेत नाही म्हणावे लागते. तेव्हा कोणीतरी दैनिक सकाळच्या गुड मॉर्निंग सदरात आलेल्या 'न जिंकलेली पैज' या लेखाची आठवण करून देतो किंवा मला तरी माझ्या चहा न घेणाऱ्या मित्राबद्दल सांगावे लागते.काल गावाकडे गेल्यानंतर माझे मित्र न जिंकलेल्या पैजेतल्या मित्राच्या भेट घेण्याबद्दल बोलले.तेव्हा मला आमचे बालपण आठवले माझा मित्र बंडू बापूराव पांचाळ जो,की आज त्याचा पारंपरिक सुतारकीचा व्यवसाय करतो आणि मी शिक्षण घेऊन शिक्षक म्हणून काम करतो.माझे वडील टेलरिंगचे काम करायचे. आम्हाला शेती नव्हती, म्हणजे आम्ही भूमीहीन होतो,म्हणून लहानपणी कोणाच्यातरी शेतात मुगाच्या शेंगा तोडायच्या निमित्ताने खायलाही मिळतात,म्हणून मी आणि माझा मित्र बंडू पांचाळ मी इयत्ता तिसऱ्या वर्गात आणि तो सातव्या वर्गात असताना म्हणजे १९९२-९३ यावर्षी जवळपास ३० वर्षांपूर्वी आम्ही चहा न पिण्याची पाच रुपयांची पैज लावली.आम्ही इतरही खूप अभ्यासाच्या,शुध्दलेखन लिहिण्याच्या,पाढे पाठांतराच्या वगैरे शर्यती लावायचो जिंकायचो हरायचो,पण ३० वर्षांपूर्वी चहा न पिण्याची लावलेली शर्यत आम्ही दोघांपैकी आज पर्यंत जिंकलो किंवा हरलेलो नाहीत.ते फक्त आमच्या एकमेकांच्या मैत्रीवर असलेल्या अपार विश्वासामुळे.माझ्या गावात त्या काळात फक्त इयत्ता चौथी पर्यंत शाळा होती,म्हणून मला इयत्ता पाचवीपासून मामासोबत कल्याण जि.ठाणे कधी आजोळी शेलगाव जि. जालना त्यानंतर सेलू आणि पुढे डी.एड साठी बुलढाणा,नोकरीच्या निमित्ताने कोकणात दापोली आणि पुन्हा स्वजिल्ह्यात सेलू येथे भटकंती करावी लागली. मी असा पाचव्या वर्गापासून शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने गावापासून दूर दूर रहात गेलो,पण मी किंवा माझ्या मित्राने आपल्या मैत्रीवरचा विश्वास कधी ढळू दिला नाही.मी माझ्या पद्धतीने ठाम राहिलो आणि तो त्याच्या पद्धतीने ठाम राहिला.मी अनेक रंगा रूपाच्या मित्रांसोबत राहिलो.महाराष्ट्रभर वेगवेगळ्या कारणाने फिरलो,पण माझ्या मित्रांनीही मला कधीही शर्यत तोडायला भाग पाडले नाही.त्यांनीही माझी मैत्री टिकावी,पैज टिकावी म्हणून नेहमी सहकार्यच केले.मला माझे कधी कौतुक वाटले नाही.कारण मी शिक्षक आहे मला नोकरी आहे. मला चहा न घेता सावलीत अध्यापनाचे काम करायचे आहे,पण माझा मित्र त्याचा पारंपरिक सुतार कामाचा व्यवसाय करतो.म्हणजे त्याला ते काम करत असताना थकवा आल्यानंतर चहा घ्यायला पाहिजे असे कोणालाही वाटते,पण त्यांने कधीही मी कितीही दूर गेलो तरीही मैत्री वरचा विश्वास टिकवण्यासाठी चहा घेतला नाही‌.मला माहित आहे मला जसा कधीही थकवा,कंटाळा येत नाही.त्याच पद्धतीने त्यालाही कधीच थकवा किंवा कंटाळा जाणवत नसणार आहे.उलट आम्हाला दोघांनाही आमची अतूट मैत्री, आमचा एकमेकांवरचा विश्वास दृढ करणारी शक्ती आम्हाला सतत उत्साही,उल्हासित ठेवायला मदत करते. गेल्या ३० वर्षात आमच्या पैकी कोणी हरला किंवा जिंकला नाही.आम्ही हारण्या जिंकण्यापेक्षा किंवा आपल्याला पाहणारा कोणी नाही याचा विचार न करता.मैत्राने आणि मी दोघांनीही नैतिकता, विश्वास नावाची जी गोष्ट असते‌.ती कायम कोणाला न सांगता,तिचे प्रदर्शन न करता जपली.
   शरीराने जरी आम्ही ३० वर्षांपासून दूर दूर असलो,तरी मनाने आणि विचाराने कायम सोबतच आहेत.आता ही 'न जिंकलेली पैज', 'कायम न जिंकलेलीच राहणार आहे.' एखाद्याला हरवायचे त्याला कमी ठरवायचे, म्हणून आपण ठामपणे  राहायचे हा विचार आमच्या मनाला कधीही शिवला नाही आणि शिवणारही नाही.अजाणत्या वयात दिलेला एखादा शब्द पाळणे काय असते.हे मला आणि माझ्या मित्राला चांगलेच माहीत आहे.माझ्या मित्रावर आणि माझ्यावर आमच्या मायबापाने केलेले संस्कार इतके पक्के आहेत.ते कोणी कितीही प्रयत्न केलेले तरी कधी ढळणार नाहीत.मित्राला दिलेला एखादा शब्द आम्ही इतक्या सहजपणाने जपत असू,तर आयुष्यात जेव्हा केव्हा आमच्यावर विश्वास ठेवून कोणी आम्हाला एखादी जबाबदारी देईल ती जबाबदारी तितक्याच विश्वासाने नक्कीच पार पाडू.

     शरद ठाकर
   सेलू जि परभणी
  ८२७५३३६६७५

अंधारलेल्या भोवतालात उगवतीची दिशा दाखवणारी कविता 'जळताना भुई पायतळी'

अंधारलेल्या भोवतालात उगवतीची दिशा दाखवणारी कविता 'जळताना भुई पायतळी'

अलीकडेच मराठी साहित्यात गावाकडून, शेता- शिवरातून आलेले अनेक तरुण कवी, जागतिकीकरणानंतर बदलेल्या ग्रामीण जीवनाचे आणि कृषीक्षेत्राचे वास्तववादी चित्रण करणारी समकालीन कविता लिहीत आहेत.
तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांची 'जळताना भुई पायतळी' या कविता संग्रहातील कविताही ह्याच प्रकारची आहे.

'जळताना भुई पायतळी' ह्या  तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या कविता संग्रहातील कविता चार भागात विभागलेल्या आहेत. पायाखालची सरकणारी जमीन, ही कोणती वावटळ आली?,घामाची बारमाही नदी, निरूत्तर झाली माती असे चार भाग पाडून त्यात त्या त्या विषयाच्या अनुषंगाने कवितांची मांडणी केलेली आहे. त्यामुळे कविता वाचत असताना तो विषय आणखी खोल खोल आपल्या मनात उतरत जातो. एकंदरीतच ही कविता शेतीमाती, ग्रामीण जीवनातील नातेसंबंध व जागतिकीकरणामुळे झालेले जगण्यातील आणि कृषी जीवन संस्कृतीतील बदल.त्या बदलामुळे बदलत गेलेला माणूस.संपत चाललेला नात्यातील ओलावा आणि त्यामुळे माणसाच्या मनात आलेली तुटलेपणाची जाणीव करून देणारी, माणसाला जगण्याचे, वागण्याचे नवे भान देणारी ही कविता तान्हाजी बोऱ्हाडे यांनी लिहिलेली आहे.
      नव्या पिढीतल्या कोणत्याच तरुणाला आता गाव खेड्यात राहून शेतीत काम करावे असे वाटत नाही.आपल्या शेतात मालक म्हणून काम करायची लाज वाटते,पण तोच तरुण शहरात जाऊन दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला लाजत नाही.ही चुकीची मानसिकता तरुणांच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळे थोडेफार शिक्षण झाले,की प्रत्येक तरुण आपला गाव सोडून शहराकडे धाव घेत आहे.त्यामुळे आपली हक्काची शेती पडीक राहत आहे. भविष्यात गावाकडे राहून शेती कोण  करणार ? आणि जगाला अन्नधान्य कोण पुरवणार ? हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तरुणांच्या या शहरांकडे धावणाऱ्या लोंढ्यां बद्दल ते म्हणतात.
'पुढल्या पिढीला | शेतीचा उपास शहरांची कास | भाळणारी'
         (पृ.५२)

आजचा तरुण शहरी झगमगटाला तेव्हाच भाळतो आणि गावापासून आपल्या माणसा पासून तो नकळतपणे दूर दूर जातो.शेतकरी राजा म्हणवल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचे खरे दुःख काय आहे ? हे कवी तान्हाजी बोराडे यांनी त्यांच्या अनेक कवितांमधून विषद केले आहे.  'अकरावी ओळ' या कवितेत ते म्हणतात. 'शाळेतल्या परीक्षेत प्रश्न आलेला 
दहा ओळी निबंध लिहा 
विषय शेतकऱ्याचे मनोगत '
      (पृ.३९)
शेतकऱ्याचे मनोगत, त्याचे दुःख खरच त्या दहा ओळीत बसणारे आहे काय? तर नक्कीच नाही. शेतकऱ्याच्या आयुष्याची  झालेली ही परवड अतिशय प्रत्ययकारी शब्दात कवीने मांडली आहे.शहरात राहणाऱ्या भावाने गावाकडे अवकाळी पाऊस झाला,म्हणून किंवा पाऊस पडला नाही म्हणून फोनवर बोलून नुसतीच हळहळ व्यक्त करून काहीच उपयोग होत नाही.हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल झालेल्या शेतकऱ्याचे सांत्वन हे कोरडे शब्द करू शकत नाहीत. याबद्दल ते म्हणतात.
'टीव्हीवरल्या बातम्या पाहताना चहाच्या कपात विरघळणारी वांझोटी हळहळ  ठरू शकत नाहीये बुडत्या माणसांना काडीचा आधार'
            (पृ.३३)
शेतकऱ्याचे दुःख फार मोठे आहे. शेतकरी जगाच्या भरण पोषणासाठी बेभरोसी निसर्गावर विश्वास ठेवून शेतकरी काळ्या आईची कर्ज काढून  विश्वासाने ओटी भरतो हिंमतीने आलेल्या परिस्थितीला सामोरा जातो,परंतु त्याला हे दुःख जेव्हा पेलणेच शक्य होत नाही. तेव्हा त्याच्या मनाची तगमग होते.त्याला स्वाभिमानीपणाने जगणे अवघड होते. तेव्हा तो आत्महत्येसारखी नको ती कृती करतो.  शेतकरी आत्महत्येसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर कवीने समर्पक शब्दात भाष्य केले आहे.  शेतकरी आत्महत्येची चौकशी करणाऱ्या प्रशासनाला शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचे दुःख सांगताना म्हणतो तुम्ही फक्त पंचनामा आणि पोस्टमार्टम करून त्याला आज मृत घोषित केले. 'माझा बाप तर याआधीच मेलेला होता फक्त आजवर त्यांनी आपला मृत्यू जाहीर केला नव्हता'
              (पृ.२२)
   शेतकरी कशाकशाने मरत जातो याबद्दल ते म्हणतात.
'दुष्काळान होरपळून अवकाळीने झोडपून कर्जाच्या डोंगराखाली जीव गुदमरून 
दलालाच्या लूटमारीत कंगाल होऊन कोसळणाऱ्या बाजारभावात भुईसपाट होऊन वरीलपैकी कशानेही अथवा यापैकी प्रत्येक कारणाने तो मरत जातो हळूहळू आटत चाललेल्या झाऱ्या सारखा'     
            (पृ.८३)

शेतकरी आनंदाने जीवन जगत असल्याचे तो आनंदात सुखी असल्याचे नाटक शेतकऱ्याला करावे लागते कारण शेतकरी आनंदात, सुखात राहावा यासाठी कधीच कोणी प्रयत्न करत नाही.याउलट शेतकऱ्याचे जिथे तिथे शोषण कशा प्रकारे करता येईल. याचाच विचार जो तो करत असतो. निसर्ग, शासन,प्रशासन , व्यापारी, दलाल असे अनेक जण शेतकऱ्यांचे शोषण करायला टपलेलेच असतात या सर्वांच्या कचाट्यातून कसाबसा सुटलाच तर शेतकऱ्याला कसेबसे जीवन जगता येते. आपण दुःखी राहिलो तरी चालेल पण आपल्यामुळे आपले घर दुखी राहू नये म्हणून शेतकरी आपल्या घरच्यांसमोर दुःखात असला तरी सुखात असल्याचे नाटक करून जगत असतो याबद्दल हे वास्तव कवितेतून मांडताना कवी तान्हाजी बोऱ्हाडे म्हणतात. 'उपाशी पोटांनेच करतो आहे तो पोटभर जेवल्याचा अस्सल अभिनय आपल्या तोंडाकडे पाहत जेवणाऱ्या पोरांच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून' 
      ( पृ.६६)
      अशाप्रकारे शेतकरी बाप स्वतः दुःख भोगून दुसऱ्याला नेहमी सुख देण्याचे काम करत असतो. शेतात काम करायच्या उमेदीच्या वयात तरुणांना राजकीय फडात सामील करून घेतले जाते आणि ती मुलंही हातात कुदळ, फावडं घेऊन शेतात कष्ट करायचे सोडून नको त्याचे रंगीबेरंगी झेंडे घेऊन मिरवतात.कोणत्या रंगाचा,कोणत्या तत्त्वाचा झेंडा आपण हातात घेतला पाहिजे हे त्यांना काही कळत नाही.कार्यकर्तेच काय जेव्हा नेतेच जर सकाळी एका तर संध्याकाळी दुसऱ्या झेंड्या खाली जात असतील,तर या तरुण पोरांचे काय भविष्य असणार आहे?, पण त्यांचे राहणीमान,गाड्या, भाषणबाजी हे सगळं पाहून हुरळून जाऊन, त्या झगमगाटामागे लागलेल्या पोरांना आणि माणसांनाही समजत नाही की, राजकारणी स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी आपला वापर करून फेकत आहेत.त्यांच्या बोलण्यावर वांझोट्या घोषणावर विश्वास ठेवून निष्ठेने नेत्यांच्या मागे पुढे फिरणारे तरुण कार्यकर्तेच जेव्हा फसले जातात.आणि ते फसले गेल्याची  जाणीव जेव्हा होते तेव्हा ते म्हणतात.
'आम्ही भाळत आलो आजवर त्यांच्या मोठमोठ्या भाषणांवर आणि विश्वास ठेवला त्यांनी दिलेल्या घोषणांवर'
                 (पृ.८५)
आजवर कोणत्याच राज्यकर्त्यांनी शेतकरी सुखी व्हावा म्हणून त्याच्या शेतमालाला  योग्य हमीभाव दिला नाही, की शेतकऱ्याची लूट करणाऱ्यांना वठणीवर आणले नाही. शेतकऱ्यांच्या मनात वाहणाऱ्या चिरंतन दुःखाच्या नदीवर आज पर्यंत कोणालाच धरण बांधता आले नाही आणि कोणी बांधणारही नाही याबद्दल ते म्हणतात 'दुःखाची चिरंतन नदी वाहतेच आहे आमच्या पापण्याआडून अजून तरी  कोणत्याच व्यवस्थेला त्या नदीवर बांधता आले नाही धरण' (पृ.९८)

असे असले तरी याही परिस्थितीत शेतकरी जगासाठी अन्न पिकवतो,ताटातल्या घासासाठी मातीत बियाणे पेरतो,मातीत कष्ट करून वरूण राजाला विनवणी करतो. प्रत्येक जीवासाठी शेतकरी निसर्गाकडे दान मागतो,पण त्यातला काही भाग स्वतःचा वाटा म्हणून काढून घ्यायचेही तो विसरतो एवढी मोठी दातृत्वशीलता त्या शेतकऱ्याच्या मध्ये असते ही दातृत्वशीलता ते पुढील शब्दात मांडतात.
'मागणीचा आणि देणगीचा नाही कधी अभिमान माझ्यासाठी राखण्याचेही मी विसरतो भान'
 (पृ.६३)

निसर्ग चित्र (पृ.२८) व सावली (पृ.३०) या दोन्ही कवितेतून कवी पर्यावरण ऱ्हासाबद्दल बोलतात.निसर्ग चित्र काढा म्हटले,की कोणीही सहजपणे डोंगर,नदी, चार दोन झाडं,झोपडी,होडी असे चित्र काढतो,परंतु प्रचंड वृक्षतोड केल्यामुळे भविष्यात मुलांना हे सगळं बघायलाच मिळाले नाही,तर मग मुलं कुठली आणि कसली निसर्ग चित्र काढतील ?हा प्रश्न त्यांना पडतो.
  कवी तान्हाजी बोऱ्हाडे यांनी काही कवितांमधून आजच्या काळाचे चित्र आणि पूर्वीच्या काळाचे चित्र तुलनात्मक दृष्टीने आपल्या कवितेमधून प्रभावीपणे रेखाटलेले आहे. ज्यातून पूर्वीच्या काळाची परिस्थिती त्या परिस्थितीत त्या व्यक्तीचे वर्तन आणि आजच्या काळातील आजच्या माणसाचे वर्तन अधोरेखित केलेले आहे.भिंत कवितेमध्ये आई तिच्या अपराजित हातांनी भिंत सारवते तर मुलगा मोबाईलच्या दुकानात स्क्रीन गार्ड बदलण्यासाठी उभा आहे. तर लोड शेडिंग (पृ.२०) कवितेत, शेतीच्या पिक पाण्याच्या प्रश्नामुळे झोप न लागलेला बाप भल्या पहाटे लाईट जाण्यापूर्वी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात जातो,तर मुलगा झोपेतून उठून मोबाईलचा चार्जर शोधतोय,
चिमण्या  (पृ.४३) या कवितेतून कवी खूप छान पद्धतीने माणसाला पर्यावरण संवर्धनासह लेक वाचवण्याचा, वाढवण्याचा संदेश देतो. त्या कवितेत पूर्वीच्या काळी आई धान्य पाखडत असताना,चिमण्या तिच्या जवळ यायच्या आणि चिव चिव करत त्यांचा वाटा घेऊन जायच्या, 
परंतु आता आधुनिक काळात बायको ही चिमण्यांना दाणे टाकायचे काम करते,पण चिमण्या दाणे खायला येत नाहीत,कारण अनेक प्रकारचे तणनाशके  आली त्यामुळे चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे.त्या चिमण्या जशा कमी झाल्या त्याच पद्धतीने स्त्रीभ्रूणहत्येमुळे मुलीचे प्रमाण खूप कमी झाले आहे हे सांगताना ते म्हणतात
'कोणता आधुनिक आजार झाला आहे पटापट मारताहेत चिमण्या आणि माणूस ही जन्माला घालत नाहीये चिमण्या' 
       ( पृ.४३)
अशाच काहीशा आशयाच्या कविता महापूर ( पृ.२३), पायाखालची सरकणारी जमीन (पृ.२५,२६),पाऊस (पृ.३२)माणसा माणसा दार उघड (पृ.३४),पायवाट ( पृ४८)
या कवितासंग्रहात आलेल्या आहेत.त्यासोबतच माय,बाप,आजी, आजोबा,बहिण अशा विविध नात्यातील कविता आलेल्या आहेत. भिंत (पृ.१९), पायाखालची सरकणारी जमीन (पृ.२५),लोड शेडिंग (पृ.२०),हरळी (पृ.५८),आभाळातल्या थेंबा संगे (पृ ५९ ),एकनाथ   (पृ.३७ ) ,पुसूनही टाकता येत नाहीत (पृ.६४,६५),एकपात्री नाटक (पृ. ६६), भीती (पृ.७३),जखम (पृ.९०),रुक्ष भूमी (पृ.९२) या कवितांमधून कष्टकरी मायबापाच्या जीवनानुभवांची मांडणी कवीने केली आहे. 

नोंदी (पृ.२१), महापूर (पृ.२३), पायवाट (पृ.४८), जखम (पृ.८९) या कवितेमधून आजोबांचा काळ आणि आजचा बदललेला काळ खूप प्रभावी पद्धतीने मांडलेला आहे. 
संग्रहाच्या सुरुवातीलाच कवी निसर्गाला प्रार्थना करतो,की 
'चकोराच्या वाट्याचे चांदणे 
त्याचे त्याला लाभो चातकाच्या व्याकुळ कंठासाठी 
जरा लवकरच येवो वळवाचा पाऊस'
             (पृ.१४)
तर पुढे एका कवितेत
'रिकाम्या ओंजळीत दोन घास ठेवणारी माणसं शिल्लक आहेत अजून गावात त्यांची ओळ वाढो दिवसें दिवस 

झाडांना पाणी घालणारी दोन मुलं दिसतायेत शाळेच्या प्रांगणात 
त्या मुकल्या हातांना अनेकांची साथ लाभो
(पृ.३६)
अशी प्रार्थना ते निसर्गाकडे करतात. 

या संग्रहात मोबाईल,लोड शेडिंग,चार्जर,बॅटरी, लाईट, स्क्रीन गार्ड, टाईम टेबल,इमेजेस, डिलीट,स्मायली, फ्लॅट अशा इंग्रजी शब्दांचा उल्लेख आलेला आहे. अलीकडच्या काळातील भाषेतील ही समिश्रता तितक्याच सहजपणे कवितेत आलेली दिसते.
उगवतीची दिशा (पृ.१०२) या कवितेतून कवी तान्हाजी बोऱ्हाडे
यांच्या बापाने त्यांना उगवतीच्या दिशेने चालायला सांगितले आहे.
'बापानं हातात नांगर देण्याऐवजी पाटी पुस्तक दिलं आणि म्हणाला उगवतीच्या दिशेनं चालत जा...'( पृष्ठ १०२)
हे सांगणे फक्त त्यांच्या एकट्या पुरते न राहता समस्त मानवजातीने आणि विशेषत: शेतकऱ्याच्या मुलांनी उगवतीच्या दिशेने चालत जायला ही कविता सांगते आहे. उगवतीची दिशा म्हणजे सुशिक्षित होण्याची,शिकण्याची, आत्मभान जागृत करण्याची दिशा आहे. म्हणून कुणब्याच्या पोराने उगवतीच्या दिशेने जावे असे प्रत्येक शेतकरी बापाला वाटते. कारण शेतकऱ्याचा शेवट काय आणि कसा होतो.हे प्रत्येक शेतकरी जवळून पाहतो.आपला मुलगा उगवतीच्या दिशेने गेला तरच त्याची प्रगती होईल,नाहीतर काय होते? हे ते पुढील शब्दात सांगतात.
'हातात नांगर असलेला 
कुणबी कुठंही गेला तरी मावळतीच्या डोहाजवळच पोहोचतात त्याची अभागी पावलं'
         (पृ.१०२)
दर्शन मांजरे यांनी कुणब्याचा श्वास असलेली भुई, शेतकऱ्याला हिंमतीने जगायला शिकवणारी,त्याची साथ करणारी औताची बैलजोडी.यांची समर्पक मांडणी करुन आकर्षक मुखपृष्ठ साकारले आहे. समीक्षक दा.गो. काळे यांच्यासारख्या जेष्ठ समीक्षकांची  पाठराखण या संग्रहाला लाभलेली आहे.

जास्त काही सांगण्यापेक्षा ज्याचे जळते त्याला जास्त चांगल्या पद्धतीने कळते, कळत असते. जसे ज्या बोटाचे दुःख त्या बोटाला भोगावे लागते.तशी ज्या शेतकरी बांधवांना प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करावे लागतात. शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना काय काय दुःख भोगावे लागते हे त्यांनाच ठाऊक असते. कवी तान्हाजी बोऱ्हाडे हे स्वतः एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबातील असल्याने त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले, अनुभवलेले शेतकऱ्यांचे दुःखद वास्तव अतीशय प्रभावी शब्दात चित्रित केले आहे .शहरात राहून कधीही शेती न पाहिलेल्या फक्त नावावर शेती आहे, म्हणून शेतकऱ्याची लेकर म्हणवणाऱ्या उपऱ्या शेतकऱ्यांना अन् त्या उपऱ्या पोरांना शेतकरी बापाची होणारी ही व्यथा काय समजणार  ? ते दुःख जो भोगतो त्या शेतकरी माय-बापालाच आणि त्यांच्या च्या मुलाबाळांनाच माहीत 'जळताना भुई पायतळी' काय होते ? ते...

कवी - तान्हाजी रामदास बोऱ्हाडे


कवितासंग्रह : 'जळताना भुई पायतळी' 


प्रकाशन -
काव्यग्रह प्रकाशन, वाशिम

मूल्य १५० रुपये 
पृष्ठ १०४

    शरद ठाकर 
सेलू जि. परभणी
८२७५३३६६७५