एकूण पृष्ठदृश्ये

नमस्कार आपलं या वेबसाईटवर स्वागत आहे

१३ जून २०२३

संवेदनशीलतेचा उजेड पेरणाऱ्या काळोखाच्या कविता


"संवेदनशीलतेचा उजेड पेरणाऱ्या काळोखाच्या कविता"

 

'काळोखाच्या कविताहा कवी नामदेव कोळी यांचा वर्णमुद्रा प्रकाशन,शेगाव यांनी प्रकाशित केलेला कवितासंग्रह असून,मुखपृष्ठ राजू बाविस्कर यांचे तर आतील बोलकी रेखाटने जितेंद्र साळुंखे यांचे आहेत.डॉ.भरतसिंग पाटील यांच्या प्रदीर्घ प्रस्ताविकेतून कवितासंग्रहाचा परिचय होतो.

        साधूचे कूळ आणि नदीचे मूळ पुसू नये असे म्हणतात त्याप्रमाणे कवी त्यापुढे जाऊन काळोखाचे गूढ पुसू नये असे म्हणतो.हा दुःखाचा वेदनेचा काळोख सर्वांच्याच वाटेला आलेला असतो. दुःखाच्या काळोखाची सल मनात असते म्हणूनच कवितेचा अर्थात 'काळोखाच्या कवितेचाजन्म होतो.आणि या कवितेच्या माध्यमातून कवी उजेडाची तिरीप होऊन जातो. 

 "अस्वस्थता पोखरते माझं सबंध शरीर 

मन मेंदू पेशीपेशी 

एक उजेड चालत येतो माझ्या दिशेने विलीन होतो माझ्यात 

मी उजेडाची एक तिरीप"

   ( उजेडाची एक तिरीप पृ.१६) 

     दुःखाचा हा काळोख सरावा म्हणून जो तो प्रयत्न करत असतोपण काही लोक अडचणीच्या दुःखाच्या काळात आपल्या म्हणवणाऱ्यां सोबत राहतात आणि उजेडाची तिरीप येताच सर्वांना सोडून भूतकाळ विसरून पुढे जातात.परंतु या काळोखाच्या कवितांमधून आपल्याला खऱ्या अर्थाने कवी आपल्या कवितेतून त्यांच्या माय बापा विषयी कसे संवेदनशील आहेत हे प्रकर्षाने जाणवते आणि या कविता काळोखाच्या जरी असल्या तरी वाचकाच्या मनात त्या हळुवारपणे संवेदनशीलतेचा उजेड पेरण्याचे काम करतात.

    काळोखाच्या कविता हा कवितासंग्रह कवीच्या काळोख्या आयुष्यात चैतन्याचा उजेड पेरणाऱ्या वासंतीताई आणि बाबांना अर्पण केलेला आहे. प्रिय वासंतीताईस ह्या  कवितेतून  ताई म्हणजे जणू आईचे दुसरे रूपच.आईची जशी लेकरावर माया असते त्याच प्रमाणे ताईही आपल्या भावासाठी पडेल ती काम करतेकष्ट करते कठीण परिस्थितीमुळे शिक्षणाचा खर्च झेपत नाही म्हणून स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडून भावाच शिक्षण पूर्ण झालं पाहिजे,भाऊ शिकला पाहिजे त्याच्या आयुष्यातील काळोख कमी झाला पाहिजे. ही तिची भावना असते. प्रिय वासंतीताईस या कवितेत मला माझ्यासाठी शिक्षण अर्धवट सोडणारी माझी ताई मला दिसते. भावाच्या  आयुष्यात उजेड पेरण्यासाठी उन्हातान्हात खपून मेहनतीची काम करूनगुरंढोरं सांभाळणारी गवताचे भारे कापणारी,खुरपणाच्या तासाला सगळ्यात पुढे असणारी बहिण-भावाला प्रेमाचा सल्ला पुढील शब्दात देते.

 "गह्यरा मोठ्ठा मानूस बनजो

आपल्याले कमी लेखनारांच्या

नाकातले केसं बाय्जो

गरिबाले हलकी वडांग समजनारांले दाखोई देजो 

एक ढोरक्याचा पो-याबी शिकी सवरीसन घरदार पुढे नेवू शक्तो

   (प्रिय वासंतीताईस,पृ.५४ )

पण दुःखाची गोष्ट हीच की,काळोखाचे दिवस पालटलेले असतांना हे सुख पाहायला काळोख दूर सारणारी उजेड पेरणारी ताई आज नाही.

     अभावग्रस्त वातावरणातही माय कशी परिस्थितीशी दोन हात करते.नेटाने जगण्याची अन् कुटुंब जगवण्याची लढाई कशी हिंमतीने लढते हे सांगताना कवी म्हणतात.

"कित्येक पावसाळे गेले

 पण 

थेंबांशी झुंजणारी माय

मात्र कधी थकली नाही"

   ( अथक,पृ.२१)

 थकनं कुढणं हे मायीला माहीतच नाहीसकाळी उठल्यापासून हात चलताच असतो.रामपहारी उठली की सडा-सारवण करणं,गोठ्यातील शेण काढणं,स्वयंपाक करणं,धुणीभांडी करणं,शेतात जाणंशेतातून आलं की पुन्हा चुलीला लागायचं  स्वयंपाक करायचा,चिल्यापिल्यांना खाऊ घालायचं,खरकटी भांडीकुंडी करून उद्याची चिंता करत झोपायचं.ही नित्याची लढाई माय कशी लढते हे पुढील शब्दात सांगितले आहे.

"तिन्ही सांजेची लढाई  

चुलीतल्या निख-याशी

जन्मभराची टक्कर

दुनियेच्या पसा-याशी"

(जीव खोल खोल डोह,पृ.२५)

  या काळोखी दुनियेशी टक्कर देत असताना माय जुने लोकसंकेत,श्रद्धा-अंधश्रद्धा सर्व बाजूला सारून अमावसेच्या दिवशी लेकराला आवडणारी उडदाची डाळ शिजवते.परिस्थितीशी दोन हात करते,परंतु मुलगा जेव्हा शहरात जायला निघतो.तेव्हा ती हळवी होते.

निघालो तेव्हा घर रिकामं रिकामं धुरानं माखलेलं

तिच्या डोळ्यात आभाळ भरून आलेलं

     (आभाळ पृ.२८)

     ज्यांनी शिक्षण नोकरीच्या निमित्ताने घर सोडलेलं असतं त्यांनी हे आभाळ भरून येणं अनुभवलेलं असतं.

   'मायनं कविता केली असती तरह्या कवितेत मायन कविता कशावर केली नसती हे कवितेतून मांडतानाच तिला नियतिवर कविता लिहायची असेल असे म्हणतात.निश्चितच मायने रडत कुढत बसणारी,दु:ख सांगणारी  कविता लिहिली नसती तर मायने नियतीवर कविता लिहिली असती आणि नियतीला ही ठणकावून सांगितले असते तू कितीही निष्ठूरपणे वाग मी तुझ्यावर विजय मिळवणारच.

      माय,अथक,सुखाचं मरण,गवरीची राखजीव खोल खोल डोह,आभाळ,नजरा नजर,चिमणी,मायन कविता केली असती तर ह्या कवितांमधून माय कशी आहे.हे आपल्याला समजून येते.    

        माय जितकी सोशिक नियतीवर विजय मिळवणारी तेवढाच बापही संसाराला हातभार लावणारा आयुष्याच्या शेवटच्या काळातही गुरं ढोरं राखून,   लोकाची रानं बटईन करून कष्ट करणारा.बाप सालभरचा दाळदाना धकावा  याच्यासाठी लोकांच्या वावरात राबतो प्रसंगी स्वतःची जमीन पडीक पडू देतो पण दुस-यांची शेत नेटाने मनलावून बटईने करतो.बटाईने केलेल्या शेतात फायदा होईल,की तोटा हे निसर्ग,बाजार या बेभरवशाच्या जीवावर तो एक प्रकारे शेती बटाईने करून जुगारच खेळत असतो.

 “शेती हा जुगार आहे

 कितीदा अनुभवूनही

बाप घालत असतो उखळात डोकं"

  (बटाई पृ.३३ ) 

कितीही कष्ट झाले तरी काळ्या आईची ओटी भरणे.हे कर्तव्य समजणारा  बाप बेभरवशाची शेती आनंदाने करत राहतो. गुरं ढोरं राखून लोकांची रानं बटईन करूनगुराढोरांना सर्वस्व समजणाऱ्या बापाला जेव्हा ढोरांच्या वाड्यात सुने खुंटे  दिसतात.तेव्हा थकलेला बाप अस्वस्थ होतो.घरात जेव्हा बाप असतो तेव्हा बाप कधी कोणाला रागं रागं बोलत नसला तरी  त्याच्या असण्याचा नैतिक धाक असतो.त्यामुळे घरात आई,सुन डोक्यावरचा पदर सारखा सावरत असतात.त्या सोबतच बापाच्या धाकाने  घरात सर्व काही ठीकठाक असतं परंतु बाप गेल्यानंतर घरातला धाकही संपून जातो.ह्या पोरकेपणाचा घरच्यां शिवाय बाकी कोणाला फरक पडणार नसला तरी बाप गेल्यानंतर काय झालं आहे. ते पुढील शब्दात सांगतात. 

"सुनी पडली नदीची वाट

पोरकी झालीत गावातील गुरं-ढोरं  

दिसली नाही दिवटी लव्हाळीच्या नागफणांची

दिवाईची गाणीकितीतरी लोककथा

सोबत घेवून गेला बाप 

याचा कुणालाच नाही पडला फरक"

  ( धाक पृ.६६)

 

        ढोरांशी बनलय बापाचं नातं,

पडीक,बटाई,पोरकंपण,ठिबक,सुने खुंटे,बेलगाम,धाक ह्या कवितांमधून नामदेव कोळी यांनी शेतकरी कष्टकरी बाप उभा केला आहे. 

       पुढे माय-बापाच्या दोघांच्या कविता आहेत.'लवकरच पाऊस येईल म्हणून 'या कवितेतून दुस-यांच्या आनंदात आनंद शोधणारे माय बाप भेटतात.पखांचे मुंगळे दिसले की माय सुखावते कारण मायीला माहित आहे. पखांचे मुंगळे निघाले म्हणजे आता लवकरच पाऊस पडणार आणि सगळीकडे समृद्धी येणार म्हणून आनंदून जाणारी माय अन् शेतात गायी वासरांच उड्या मारणंचिमण्यांची धुळांघोळ,मोरांचा नाच पाहून बापही आनंदी होतो.दुस-याच्या आनंदात आनंद पाहिला की घरही आनंदून जाते.

  थकलेल्या मायबापाची कविता मध्ये बाप सकाळ पासून फाटक्या कपड्यानिशी ढोरं घेऊन रानात जातो आणि माय अनवाणी पावलांनी दूरवरच्या रानात जाते दोघंही कष्ट करतात,बाप सांधेदुखी घेऊन तर माय पायांत कुरपं घेऊन परतते अन् कवी शहरातल्या मुलांना थकलेल्या माय बापाची कविता शिकवून परततो.या कवीते मधून  कवीची आपल्या माय-बापाला म्हातारपणी कष्ट करावे लागतात या बद्दल अपराधीपणाची भावना दिसून येते.माय बापाला शेतात मदत करावी की शहरात काम कराव ह्या प्रश्नांच मोहळ सारखं कवीच्या डोक्यात असतं. प्रगती करायची तर गाव सोडावं लागत,शहरात जावं लागत,तिथेही प्रयत्न करत राहून मेहनत करावी लागते,पण पैसा,प्रगती,प्रतिष्ठा यासाठी हे सगळं करावच लागत.

"माय माती माणसं

ओढून नेतात गावात

पैसा प्रगती प्रतिष्ठा

झुलवत ठेवते शहरात"

   (प्रश्नांच मोहळ पृ.१५)

     'ही कुठली दहशत?' या कवितेतून शेतमजूरांना उन्हातान्हात कष्ट करून कामाचे दाम मागायला शेत मालकाला घाबरत घाबरत पैसे मागावे

लागतात.शेतमजूरांच्या मनातली शेतमालका बद्दल ची दहशत या कवितेतून दिसून येते.बाप जेव्हा पोरग शिकावं म्हणून पाटलाची खंडीभर ढोरं फुकट सांभाळतो. मास्तरान पोराला चांगलं शिकवावं म्हणून माय मास्तराला दाळदाना देते अन् शेवटी पोरग शिकून पाटलाचा आणि मास्तराचा त्यांच्याकडे किती पैसा शिल्लक राहिला हा हिशोब माय बापाला सांगतो.तेव्हा आपल शोषण झालं,पण लेकरू शिकल्यामुळे आता त्याचं कोणीही शोषण करू शकणार नाही.याचा आनंद पुढील ओळीत व्यक्त केला आहे.

 “अक्षर शून्य माय बापाला

हिशोबातल कवडी इतकंही कळत नाही

पण पोराला हिशोब येतो 

याचा आनंद आभाळात मावत नाही"

      (हिशोब पृ.४५)

   ज्या विळ्याच्या जोरावर बापाने ह्या काळोखाला चिरलं त्या विळ्याशी जन्मभराच नातं आहे.कारण विळ्याच्याच मदतीने मायने लेकरांच्या नाळी कापल्या,आपल्या गुरांसाठी चारा कापला,जनावरांची शिंग साळली प्रत्येक ठिकाणी मदतीला येणाऱ्या विळ्याला

बापानं धार लावली अनेक काम घेऊन हातावेगळी केली.जगण्याची लढाई लढली परंतु आता विळ्यासह घराला धार लावणारे आणि काळोखाला चिरणारे बाबा नसल्याने मायीचेही हात बोथट झाले आहेत.

अशाप्रकारे थकलेल्या माय बापाची कविता,ही कुठली दहशत,हिशोब,विळासमुद्र न पाहिलेला माणूस,सलाईनससा रे ससा,गणगोत या कवितांमधून माय बापाचे  दर्शन होते .

     शेतमजूर या कवितेतून शेतमजूरांचे हाल मांडतानाच तत्रैव ही कविता शेतमजुरांचे मन पिळवटून टाकणारे प्रश्न आपल्या समोर अधोरेखित करते. 

घरोबा,मजबूरी,शेतमजुराच्या पोरी या कवितांमधून शेतमजुरांचे शोषण त्यांची होणारी कुचंबना दिसून येते. त्यांच्या वाट्याला आलेले हे परंपरेने आले आहे. म्हणून ते त्याच मार्गाने चालत राहतात त्यामुळे शेतमजुरांच शोषण होतच राहते त्यांना सर्वकाही सहन करावं लागतं. परिस्थितीमुळे ते स्वीकारावं लागतं.हे पुढील ओळीत मांडलेले आहे

"शेतमजुराच्या पोरी गरीब गायी

बिनबोभाट आपलासा करतात अनोळखी खुंटा

स्विकारतात आपल्या वाटेचा भोगवटा

रात्रीचा दिवस करत भोगतात आपली जन्मठेप"

    (शेतमजुराच्या पोरी पृ.५१)

   शेतकरी शेतमजुरांचं हे अख्ख गावच सरकारी दवाखान्यात वेगवेगळ्या समस्यांनी भरती झाला आहे.गावातल्या प्रत्येकालाच कुठलं तरी दुखन झालेलं आहे.

"गरिबाला आजाराला नापिकीला कंटाळून

मरून पडलंय अवघं गाव शवागारात

शहरातल्या सरकारी दवाखान्यात"

      (सरकारी दवाखाना पृ.५६)

     अशा शब्दात गावाचं दुःख मांडलेल आहे.त्यापेक्षा शहरात जाऊन पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी गाव सोडून लोक चालली आहेत.

खेड्यापाड्यात टी.व्ही.,मोबाइल पोहोचला पण भुकेचा प्रश्न सुटला नाही.म्हणून बरेच लोक गाव सोडून निघून चालले आहेतपण काही अंधश्रद्धाळू लोक गाव ओसाड झालं तर लक्ष्मी कोपेल म्हणून गाव सोडायला तयार नाहीत.जुन्या वाड्याच्या भिंतीवर पिंपळाचे झाड वाढावं तसं मोठ्या उमेदीने शेतात राबून कष्ट करणाऱ्या शेतकरी,शेतमजुरांमुळेच गावाला गावपण टिकून आहे.हे पुढील ओळीतून स्पष्ट होते. "कित्येक पिढ्यांपासून

गावाला चिकटलीयत ही माणसं

कराडीवर मुळ्या रोवत

उमेदीन वाढणाऱ्या झाडांसारखी

  (भंगतीचा पाय पृ.६८)

    एकंदरीतच काळोखाच्या कविता मधून माय,बाप,माय-बाप,शेतकरी शेतमजूर,गाव,गावकरी अन् शहरातील कष्टप्रद जगण्यातूनही जगण्याकडे सकारात्मकपणे पहायला मिळते.

 

कवितासंग्रह - काळोखाच्या कविता

कवी-नामदेव कोळी

प्रकाशन- वर्णमुद्रा प्रकाशनशेगाव.

मूल्य -२५० 

 

  शरद ठाकर 

८२७५३३६६७५

सेलू जि परभणी

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा