एकूण पृष्ठदृश्ये

नमस्कार आपलं या वेबसाईटवर स्वागत आहे

१० जून २०२३

प्रेमासह सामाजिक आणि नैतिक भान देणाऱ्या 'कविता : विशीतल्या आणि मिशीतल्या'

 प्रेमासह सामाजिक आणि नैतिक भान देणाऱ्या 'कविता : विशीतल्या आणि मिशीतल्या'



'कविता विशीतल्या आणि मिशीतल्या ' हा मधुकर जाधव यांचा कवितासंग्रह शीर्षकापासूनच आकर्षणाचा विषय वाटतो. या संग्रहात एकूण ७१ कविता असून, या कविता दोन भागात विभागलेल्या आहेत.पहिल्या भागात शीर्षका प्रमाणेच विशीतल्या कविता आहेत. काव्यलेखनाची सुरुवात बहुतेक करून तारुण्याच्या काळात होते आणि त्या तारुण्याच्या काळात कवीचे आकलन, त्याचे रुचीचे विषय यानुसार कविता लेखन व कवितेचे विषय त्या कवितेतून येत असतात, पण तारुण्यात काव्य लेखन करणारे बहुतेक कवी प्रेम कवितेपासून काव्यलेखन करतात. विशीतला काळ हा कोणावर तरी प्रेम करण्याचा, झुरण्याचा असतो. त्याप्रमाणे मधुकर जाधव यांनी पहिल्या भागात प्रेमकविता घेतलेल्या आहेत. कवीही माणूस असतो. माणूस म्हटला की तोही कोणावर तरी प्रेम करतो. परंतु कोण काय म्हणेल म्हणून बरेच कवी प्रेम कवितेला आपल्या कवितासंग्रहात जागा देत नाहीत. परंतु मधुकर जाधव यांनी प्रेम कवितांचाच एक विभाग केलेला आहे. प्रेम म्हणजे वासना, विकार न ठरता प्रेम ही एक निकोप, निरागस भावना असली पाहिजे. प्रेम फक्त प्रियकर प्रेयसीचेच असते अशातली गोष्ट नाही. तर जीवनात प्रेम करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. ज्यावर आपण प्रेम करावे, पण तसे होताना दिसत नाही. उगाचच कुणावर एकतर्फी प्रेम करणे चुकीचेच आहे. प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे.

प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असू शकते, म्हणून मला जे आवडते. ते प्रत्येकालाच आवडेल ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.त्यातून अपेक्षाभंग होऊन नको ते घडते. प्रेमाच्या, विरहाच्या, रुसण्याच्या, फुगण्याच्या, स्वप्नाच्या अनेक कविता विशीतल्या कवितेत आहेत.


            मिशीतल्या कविता या भागातील कविता ह्या प्रेमाच्या रंगीबेरंगी स्वप्निल दुनियेतून बाहेर आल्यानंतर खऱ्या अर्थाने जगणे आणि जीवन काय आहे याचे भान आल्यानंतर, जीवनातले टक्के-टोम्पे खाल्ल्यानंतर जगण्याचे प्रगल्भभान आल्यानंतरच्या कविता ह्या भागात आलेल्या आहेत.आपल्याला कविता बदलली असे वाटत असले, तरी कविता तीच असते.फक्त आपल्या जगण्याचे संदर्भ बदललेले असतात. तारुण्यात प्रेम, प्रौढत्व आले, की घर संसार आणि त्यासोबतच अनेक समस्या अशा बदलामुळे आपल्याला कविता बदललेली वाटते, परंतु कविता तीच असते फक्त त्या कवितेचे विषय आणि आशय मात्र बदललेले असतात. याबद्दल ते म्हणतात.


' कविता कविताच असते

विविध अर्थछटा मांडणारी

आयुष्याचे दुवे सांधणारी

बदलत जातात शब्द, अर्थ

फार तर कवितेचे विषय'


        लोकप्रतिनिधींच्या भूलथापांना, स्वार्थी राजकारणाला आणि त्या स्वार्थी राजकारण्यांच्या आश्वासनांना भुलणाऱ्या मतदारांना ते त्यांच्या कवितेच्या माध्यमातून जागृत करण्याचे काम करतात. कारण कुठलाही पक्ष सत्तेत येईपर्यंत जनतेच्या सोबत असतो. त्याला सर्वसामान्यांबद्दल कळवळा असतो आणि तेच जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा त्यांना कोणाबद्दलही आस्था वाटत नाही. शेतकरी, शेतमजूर यांचे नित्याचे प्रश्न त्यांना सोडवावे वाटत नाहीत, की शेतमालाला हमीभाव मिळवून द्यावा वाटत नाही. गरीबी, बेरोजगारी, खून, स्त्रियांवर होणारे अत्याचार हे थांबवावे असे कोणालाही वाटत नाही. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सत्ता पाहिजे असते आणि ती मिळवण्यासाठी ते नैतिकता, नितीमत्ता, निष्ठा या सर्व गोष्टी गौण ठरवून राजकारणी लोक आपला स्वार्थ साधून घेत असतात, तर सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र नीतिमत्ता, निष्ठेच्या नावाने नको त्या माणसांमागे लागून आपले कामकाज सोडून त्यांच्या मागे भटकत असतात. आपल्या मतलबापुरता गोड बोलणारा, कौतुक करणारा आपला माणूस जेव्हा त्याचा स्वार्थ साधला की बदलतो. तेव्हा सर्वसामान्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे मतदारांनी जागरूकपणे विचार करून निस्वार्थपणे चांगले काम करणाराला मतदान केले पाहिजे. तरच आपली लोकशाही टिकून राहिल हे ते पुढील शब्दात सांगतात.


'मतदारांनो जागरूक राहा 

नका पडू बळी भूलथापांना 

मतदानाचा हक्क बजावून 

वाचवा प्राण लोकशाहीचे'


     या कवितासंग्रहात आई-वडील,आजी यांच्यासह देश प्रेमावरच्याही कविता आहेत. बऱ्याच वेळा काही लोक आपल्या मायबापाने आपल्यासाठी काय करून ठेवले आहे असे विचारत असतात, परंतु त्यांना या गोष्टीची जाणीव नसते, की हा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण मुलगा म्हणून आपल्या माय बापासाठी काय केले आहे. 'जावे त्याच्या वंशा' या कवितेतून बापाचे कठोर वागणे काय आणि कसे असते, त्यांच्या वागण्यातल्या कठोरपणाही का महत्त्वाचा असतो आणि त्या कठोर वागण्यातही आपले हीत कसे आहे हे ते सांगतात. मायबापाने माझ्यासाठी काय केले हे समाजातले लोक विचारत असतील, पण कवी मधुकर जाधव यांना हा प्रश्न विचारणे सयुक्तिक वाटत नाही. कारण समाजातला प्रत्येक मुलगा आदर्श पुत्र म्हणून वागला पाहिजे असे त्यांना वाटते म्हणून ते म्हणतात.


'आज जरी समाज निष्ठूर आहे 

अनैतिकतेचे जिथे काहूर आहे 

दुर्जनांच्या भरलेल्या मैफिलीत 

सज्जन म्हणून जगायचे आहे'


          अशा पध्दतीने प्रत्येकाने स्वत:हून सज्जनासारखे वागायचे ठरवले, तर समाजात वृध्दाश्रम चालवायची वेळ येणार नाही.


        आज आपण दुसऱ्याच्या नावाने खडे फोडतो. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काहीच केले नाही म्हणतो, पण आपण याही गोष्टीचा कधीतरी विचार केला पाहिजे, की माझ्याही कामगिरीचे मूल्यमापन माझ्यानंतर येणारी पिढी करेल तेव्हा मलाही त्यांना उत्तर द्यावे लागेल. या गोष्टीची जाणीव ठेवून प्रत्येकाने वागले तर सर्वांनाच चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही, म्हणून जल, जंगल, जमीन, नैसर्गिक पर्यावरण यांचा व्यवस्थित वापर करून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. तरच येणारी पिढी आपल्याला माफ करेल, एवढेच नाहीतर मानवतेचे,

संस्कारशीलतेचे, प्रेमाचे, आपलेपणाचे, आपुलकीचे जे विविध जाती धर्मातील एकोप्याचे नातेसंबंध आहेत. त्याचा वसा आणि वारसा आपण पुढच्या पिढ्यांना दिला पाहिजे. ज्या पद्धतीने बिजाचे अंकुरात, अंकुराचे रोपात, रोपाचे महावृक्षात रुपांतर होते आणि तो वृक्ष फळं, फुलं, सावली, ऑक्सिजन आणि बरेच काही माणसाला देतो. ही त्या झाडामधील देण्याची वृत्ती, दातृत्वशीलता माणसात उतरावी ही अपेक्षा कवी मधुकर जाधव यांनी केली आहे. ही अपेक्षा म्हणजे जणू आधुनिक पसायदानच म्हणावे लागेल ते म्हणतात.


'बीज, अंकुर, रोपटं, महावृक्ष 

असे निसर्गनियम अबाधित राहो 

ही अपेक्षा आता पिढीजात व्हायला हवी 

सावली देण्याची अंगभूत काला 

माणसालाही अवगत व्हायला हवी'


        माणसाला वरवर सुंदर होण्यासाठी, दिसण्यासाठी ब्युटीपार्लर आहेत. ज्यामध्ये माणसाचे वरवरचे सौंदर्य वाढवता येते. वरवरच्या सौंदर्यापेक्षा माणूस मनातून सुंदर, निरोगी असला पाहिजे यासाठी समाजात ब्युटी पार्लर सारखे माणसाला विचारशील, सुसंस्कारित करणारे 'थॉट पार्लर' निर्माण व्हावेत असे त्यांना वाटते. जागतिकीकरणाच्या झपाट्यात माणूसही बदलत चालला आहे. सोशल मीडियामुळे तर तो अधिकच संकुचित होतो आहे. समोरासमोर भेटणाऱ्या माणसाला बोलायला वेळ नाही, पण ऑनलाईनच्या माध्यमातून एकमेकांबद्दल उगाचच आपलेपणा दाखवला जात आहे. 'युज अँड थ्रो' च्या जमान्यात माणसाचा वापरही 'युज अँड थ्रो' सारखा करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे असे त्यांना वाटते.


शेतकरी, मराठी भाषा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीचा विचार, तरुणाई, विविध प्रवृत्ती, मन अशा काही विषयांवरच्या कविता अभंग छंदातून कवी मधुकर जाधव यांनी उत्तमपणे मांडलेल्या आहेत. मधुकर जाधव अभंग छंद उत्तम प्रकारे हाताळू शकतात.

एकंदरीतच विशीतल्या आणि मिशीतल्या ह्या कविता माणसाला प्रेमाच्या दुनियेची सफर करत सामाजिक आणि नैतिक भान देणाऱ्या कविता आहेत. कवितासंग्रहास

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांची नेटकी पाठराखण लाभलेली असून, चित्रकार अरविंद शेलार यांचे मुखपृष्ठ असून प्रा.प्रशांतकुमार डोंगरदिवे यांची कल्पक रेखाटने आहेत. अशा या सर्वांग सुंदर संग्रहास खूप खूप शुभेच्छा!



कवितासंग्रह - कविता : विशीतल्या आणि मिशीतल्या

कवी - मधुकर बालासाहेब जाधव

प्रकाशन - परिस पब्लिकेशन,सासवड.

पृष्ठ -१२०, मूल्य -१७० ₹


समीक्षक

शरद ठाकर

सेलू, जि.परभणी

८२७५३३६६७५

1 टिप्पणी: