एकूण पृष्ठदृश्ये

नमस्कार आपलं या वेबसाईटवर स्वागत आहे

२४ सप्टेंबर २०२३

माणसाला माणुसकीच्या 'घामाची ओल धरून' ठेवायला शिकणारी कविता

 माणसाला माणुसकीच्या 'घामाची ओल धरून' ठेवायला शिकणारी कविता 



कवी आबासाहेब पाटील यांनी कवितासंग्रहाला 'घामाची ओल धरून' हे शीर्षक देऊन शेतकरी,कष्टकरी यांच्या श्रमाचा खरा सन्मानच केलेला आहे.शेतकरी शेतात कष्ट करतात,शेत पिकवतात.तेव्हाच माणूस आनंदाने जगू शकतो.शेतकऱ्याच्या कष्टाने,त्याच्या घामाच्या धारांनी शेतात पिक फुलून येते.प्रत्येकाच्या ताटात खायला पुरेसं अन्न मिळते.घामाची ओल धरूनच हे सगळे काही पिकलेले असते. शेतात जसे पीक उगवून यायला पाण्याचा ओलावा असावा लागतो.त्या ओलाव्या शिवाय पीक जगू शकत नाही.हे जरी खरे असले तरी त्या पिकाच्या ओलाव्यासोबतच कष्टणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाची ओल असल्याशिवाय शेतात पीक उगवून येऊ शकत नाही.

     आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डची सक्ती केल्या जाते.जे आधार कार्ड आपल्या प्रत्येक गोष्टीला ऑनलाईनपणे जोडल्या गेलेले आहे.जसे की बँकेचे व्यवहार त्यासोबतच इतर ठिकाणी.त्यावरून एखाद्या माणसाचा व्यवहार कसा आहे‌हे त्या माणसाच्या सीबील वरून ठरवल्या जाते,पण शेतकरी माणसाला सत्वशील जगणे माहीत असते. कष्ट न करता.तो कोणाचा एक रुपयाही घेत नाही.इमानदारीने जगणे एवढेच शेतकऱ्याला माहीत असते.माणुसकीचा धर्म पाळणे हेच शेतकऱ्याला माहीत असते.शेतकरी माणसासाठी कष्ट करतोच,पण त्यासोबतच तो मुक्या जनावरांची, पक्षांची काळजी घेतो.त्याच्यातलं माणूसपण जपत असतो.हे माणूस पण सांगताना ते म्हणतात.

' माणूस या एका क्यूआरकोडवर सापडत होता काळजातल्या ओलाव्याचा तळ

     (पृ.१३२)


दुसऱ्याबद्दल असलेला हा काळजातला ओलावा आता चुकूनही पाहायला मिळत नाही.आज लोक बेगडी वर्तन करून दुसऱ्याबद्दल असलेली आपुलकी दाखवतात. काही तर बोल बच्चन करून काम कमी आणि जाहिरात जास्त करतात. आजच्या काळात अशांची चलती आहे.हे सांगताना आबासाहेब पाटील म्हणतात.

'एरंड्याही खपतात गव्हाच्या दारात फक्त विकणारा ब्रॅण्डेड पाहिजे 

अन् त्याच्या शब्दांवर 

चोवीस कॅरेटचा होलमार्क

       (पृ.४६)

आशा या स्वार्थी जगात शेतकरी कष्टकऱ्यांचे जीवन विषयक वेगळे तत्त्वज्ञान ठरलेले असते.त्यांचे त्यांचे वेगळे समजूतशास्त्र असते.कष्टकरी माणूस आपल्यामुळे कोणाला त्रास नको,म्हणून पोटाला चिमटा देत,आहे त्या परिस्थितीत दुःखातही दुःखाची जाहिरात न करता आपल्या वाट्याला आलेले दुःख.तो निमुटपणे सहन करत आनंदाने जगत असतो. त्याच्यासारखीच त्याला खंबीर साथ देणारी त्याची पत्नीही आहे त्या परिस्थितीत कुरकुर न करता शेतकऱ्याचा संसार सुखाचा करून दाखवते.कारण त्यांच्यामध्ये एक वेगळी समाज आलेली असते. त्याबद्दल ते म्हणतात.

'कितीही चांगलं खाल्लं तरी 

पोटात होत नाही सोनं

हे या लोकांचं समजूतशास्त्र 

जे सोपं करतं अवघड जिणं'

      ( पृ.९२ )


आणि ज्यांचे घर पैशाने भरलेले आहेत.ते व्यापारी,कृषी केंद्रवाले लोक निष्ठेने शेती करणाऱ्या,आपल्या कृषीकेंद्रात विश्वासाने येणाऱ्या शेतकऱ्याचा विश्वासघात करून शेतकऱ्याला हिणकस,दर्जाहीन बियाणे आणि औषधांची विक्री करतात.जेव्हा शेतकरी त्याला जगणे असह्य होते.तेव्हा औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला समजते,की कृषीकेंद्रात आता विश्वासघात असा मोफत मिळतो.

या संग्रहातली नातं ही प्रश्नोत्तराच्या संदर्भातली कविता मला खूप आवडली.आजच्या व्यवस्थेला जर कोणी प्रश्न विचारायला लागला,तर त्याचं काय होतं. प्रश्न विचारणाराला कशा कशा पद्धतीने थांबवता येईल किंवा तो प्रश्न विचारणारा प्रश्न विचारायला जिवंतच राहिला नाही पाहिजे.अशा पद्धतीची व्यवस्था असते. सर्वसामान्याला वाटते,आपण व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे आणि व्यवस्थेने त्या प्रश्नाला समर्पक उत्तर दिले पाहिजे,पण व्यवस्थेला हे मान्य नसते.म्हणून व्यवस्था काय करते हे ती पुढील शब्द सांगतात.

'प्रश्नांच्या नाकात ओवतात व्यसन व्यसनीला बांधतात दावं 

जेणेकरून प्रश्न निमूट थांबतात उत्तराच्या दावणीला'

        ( पृ.९९)


प्रश्न विचारणारालाच, प्रश्नालाच जर उत्तरांच्या दावणीला असे बांधले तर प्रश्न विचारणारा तयारच होणार नाही आणि मग उत्तरे तोऱ्यात आनंदाने राहू शकतात‌.असा हा सध्याचा काळ आहे.     

      कविता कुठून,कशी जन्मते.सत्वशील जगण्याची कविता कशी होत असते.हे ते त्यांच्या 'माझं लक्ष आहे तुझ्याकडे' (पृ. ८५),कविता आहे ती (पृ.११५), समजव एकदा अक्षरांना (पृ.११०,१११) या कवितांमधून खूप छान पद्धतीने सांगतात.ते त्यांच्या 'कुठून येते कविता' या कवितेत म्हणतात.

'कुठून येते कविता? फुलातून... कळ्यातून 

की वेदनेच्या मळ्यातून ? भरलेल्या डोळ्यातून की दाटलेल्या गळ्यातून ?'

     ( पृ.९३)


खरंच कविता कुठून येत असेल, तर ती प्रत्येक संवेदनशील माणसाला जीवन जगत असताना जे जे सलतं,टोचतं काहीतरी वेगळं दिसतं तिथून तिथून कविता जन्माला येत असते.त्यासाठी असावे लागते फक्त संवेदनशील मन.या कवितासंग्रहात तुकाराम,विठ्ठल, ज्ञानेश्वर,पांडुरंग, यशोदा यांच्या संदर्भानेही कविता आलेल्या आहेत. कवी आपल्या लाडक्या विठ्ठलाला लडिवाळपणे हक्काने भांडतो. त्याला विटेवर उभा राहून तू काय पराक्रम केला आहेस.असे विचारतो.इथे शेतकरी त्याच्या कुटुंबासाठी कशा पद्धतीने दिनरात कष्ट करून.मुलांचे शिक्षण,लग्न अशा अनेक समस्यांना सामोरे जातो आणि विठ्ठला तू फक्त कमरेवर हात ठेवून उभा आहेस. शेतकऱ्यांसारखं जीवन जर तू जगून दाखवलेस.तर विठ्ठला मी तुझे टाळ कुटीन असे आबासाहेब पाटील विठ्ठलाला पुढील शब्दात सांगतात.

'जमवून दाव 

अशी उलाढाल 

तेव्हा तुझा टाळ 

कुटेन मी '

   ( पृ.१३८)


या संग्रहातील कवितांमधून अनेक प्रतिमा,प्रतीक आलेले आहेत.जसे की,भात झाकण सारून नजर टाकतो (पृ.२५), पंकचर झालेली रसिकता ( पृ. ६४), दावी कापून सोडून दिलेल्या इच्छा, आकांक्षाचं प्रेत (पृ. ८९), श्वासाचे आटलेले तळे ( पृ.७०)


  एकंदरीतच माणसाला माणुसकीच्या, माणुसपणाच्या घामाची ओल धरून ठेवायला ही कविता शिकवते‌.



कवितासंग्रह -

घामाची ओल धरून


कवी- आबासाहेब पाटील


प्रकाशक- 

शब्द शिवार प्रकाशन, मंगळवेढा,जि.सोलापूर


मूल्य-२०० ₹


पृष्ठ -१४४


प्रथम आवृत्ती- २ एप्रिल २०२२


    शरद ठाकर 

  सेलू जि परभणी

 ८२७५३३६६७५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा