एकूण पृष्ठदृश्ये

नमस्कार आपलं या वेबसाईटवर स्वागत आहे

२४ सप्टेंबर २०२३

न जिंकलेल्या पैजेतला मित्र

 काल पोळ्याच्या निमित्ताने माझ्या माले टाकळी ता.सेलू जि. परभणी या गावी डाॅ. काशिनाथ पल्लेवाड सर,दगडोबा माघाडे सर, नवनाथ गवलवाड सर या मित्रांसह गावाकडे गेलो होतो.माझ्या शेतकरी बापाला, बळीराजाला सुखावणारा पोळा हा सण काल गावात पाऊस पडला म्हणून आनंदात साजरा झाला.
  मला जिथे तिथे मी चहा वगैरे काही घेत नाही म्हणावे लागते. तेव्हा कोणीतरी दैनिक सकाळच्या गुड मॉर्निंग सदरात आलेल्या 'न जिंकलेली पैज' या लेखाची आठवण करून देतो किंवा मला तरी माझ्या चहा न घेणाऱ्या मित्राबद्दल सांगावे लागते.काल गावाकडे गेल्यानंतर माझे मित्र न जिंकलेल्या पैजेतल्या मित्राच्या भेट घेण्याबद्दल बोलले.तेव्हा मला आमचे बालपण आठवले माझा मित्र बंडू बापूराव पांचाळ जो,की आज त्याचा पारंपरिक सुतारकीचा व्यवसाय करतो आणि मी शिक्षण घेऊन शिक्षक म्हणून काम करतो.माझे वडील टेलरिंगचे काम करायचे. आम्हाला शेती नव्हती, म्हणजे आम्ही भूमीहीन होतो,म्हणून लहानपणी कोणाच्यातरी शेतात मुगाच्या शेंगा तोडायच्या निमित्ताने खायलाही मिळतात,म्हणून मी आणि माझा मित्र बंडू पांचाळ मी इयत्ता तिसऱ्या वर्गात आणि तो सातव्या वर्गात असताना म्हणजे १९९२-९३ यावर्षी जवळपास ३० वर्षांपूर्वी आम्ही चहा न पिण्याची पाच रुपयांची पैज लावली.आम्ही इतरही खूप अभ्यासाच्या,शुध्दलेखन लिहिण्याच्या,पाढे पाठांतराच्या वगैरे शर्यती लावायचो जिंकायचो हरायचो,पण ३० वर्षांपूर्वी चहा न पिण्याची लावलेली शर्यत आम्ही दोघांपैकी आज पर्यंत जिंकलो किंवा हरलेलो नाहीत.ते फक्त आमच्या एकमेकांच्या मैत्रीवर असलेल्या अपार विश्वासामुळे.माझ्या गावात त्या काळात फक्त इयत्ता चौथी पर्यंत शाळा होती,म्हणून मला इयत्ता पाचवीपासून मामासोबत कल्याण जि.ठाणे कधी आजोळी शेलगाव जि. जालना त्यानंतर सेलू आणि पुढे डी.एड साठी बुलढाणा,नोकरीच्या निमित्ताने कोकणात दापोली आणि पुन्हा स्वजिल्ह्यात सेलू येथे भटकंती करावी लागली. मी असा पाचव्या वर्गापासून शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने गावापासून दूर दूर रहात गेलो,पण मी किंवा माझ्या मित्राने आपल्या मैत्रीवरचा विश्वास कधी ढळू दिला नाही.मी माझ्या पद्धतीने ठाम राहिलो आणि तो त्याच्या पद्धतीने ठाम राहिला.मी अनेक रंगा रूपाच्या मित्रांसोबत राहिलो.महाराष्ट्रभर वेगवेगळ्या कारणाने फिरलो,पण माझ्या मित्रांनीही मला कधीही शर्यत तोडायला भाग पाडले नाही.त्यांनीही माझी मैत्री टिकावी,पैज टिकावी म्हणून नेहमी सहकार्यच केले.मला माझे कधी कौतुक वाटले नाही.कारण मी शिक्षक आहे मला नोकरी आहे. मला चहा न घेता सावलीत अध्यापनाचे काम करायचे आहे,पण माझा मित्र त्याचा पारंपरिक सुतार कामाचा व्यवसाय करतो.म्हणजे त्याला ते काम करत असताना थकवा आल्यानंतर चहा घ्यायला पाहिजे असे कोणालाही वाटते,पण त्यांने कधीही मी कितीही दूर गेलो तरीही मैत्री वरचा विश्वास टिकवण्यासाठी चहा घेतला नाही‌.मला माहित आहे मला जसा कधीही थकवा,कंटाळा येत नाही.त्याच पद्धतीने त्यालाही कधीच थकवा किंवा कंटाळा जाणवत नसणार आहे.उलट आम्हाला दोघांनाही आमची अतूट मैत्री, आमचा एकमेकांवरचा विश्वास दृढ करणारी शक्ती आम्हाला सतत उत्साही,उल्हासित ठेवायला मदत करते. गेल्या ३० वर्षात आमच्या पैकी कोणी हरला किंवा जिंकला नाही.आम्ही हारण्या जिंकण्यापेक्षा किंवा आपल्याला पाहणारा कोणी नाही याचा विचार न करता.मैत्राने आणि मी दोघांनीही नैतिकता, विश्वास नावाची जी गोष्ट असते‌.ती कायम कोणाला न सांगता,तिचे प्रदर्शन न करता जपली.
   शरीराने जरी आम्ही ३० वर्षांपासून दूर दूर असलो,तरी मनाने आणि विचाराने कायम सोबतच आहेत.आता ही 'न जिंकलेली पैज', 'कायम न जिंकलेलीच राहणार आहे.' एखाद्याला हरवायचे त्याला कमी ठरवायचे, म्हणून आपण ठामपणे  राहायचे हा विचार आमच्या मनाला कधीही शिवला नाही आणि शिवणारही नाही.अजाणत्या वयात दिलेला एखादा शब्द पाळणे काय असते.हे मला आणि माझ्या मित्राला चांगलेच माहीत आहे.माझ्या मित्रावर आणि माझ्यावर आमच्या मायबापाने केलेले संस्कार इतके पक्के आहेत.ते कोणी कितीही प्रयत्न केलेले तरी कधी ढळणार नाहीत.मित्राला दिलेला एखादा शब्द आम्ही इतक्या सहजपणाने जपत असू,तर आयुष्यात जेव्हा केव्हा आमच्यावर विश्वास ठेवून कोणी आम्हाला एखादी जबाबदारी देईल ती जबाबदारी तितक्याच विश्वासाने नक्कीच पार पाडू.

     शरद ठाकर
   सेलू जि परभणी
  ८२७५३३६६७५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा