एकूण पृष्ठदृश्ये

नमस्कार आपलं या वेबसाईटवर स्वागत आहे

०६ जून २०२३

मिरगाच्या कविता

 चला साहित्य पंढरीचे वारकरी होऊयात



      सात जून मृग नक्षत्राचे बरसणे....हा भारतीय संस्कृतीचा कणा असलेल्या बळीराजाचा सोहळा....मृग नक्षत्र बरसले तरच शेती चांगल्या पद्धतीने पिकू शकते.मृगाच्या धारा जोपर्यंत बरसत नाहीत, तोपर्यंत शेतकरी आपल्या शेतात पेरणी करू शकत नाही.

बळीराजा म्हणवला जाणारा शेतकरी सुखी राहावा,आनंदात जगावा यासाठी शेतकऱ्याला कोणाच्या,कुठल्याही मदतीची अपेक्षा नाही. त्याला फक्त मृगाचा आरंभ चांगला व्हावा वाटतो‌‌.म्हणूनच शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, परभणी शाखा सेलू व अक्षर प्रतिष्ठान सेलूच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून ' कविता मिरगाच्या ' हा कार्यक्रम सेलू येथे आयोजित केला जातो.

मराठी साहित्याची आवड असणारे,मराठी साहित्यात काही तरी करू वाटणारे,काही मित्र एकत्र येऊन स्वतः पदर मोड करून,कुठल्याही राजकीय व्यक्तीकडून आर्थिक मदत न घेता गेल्या आठ वर्षापासून साहित्यिक,सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या सेलू शहरात ' कविता मिरगाच्या' हा साहित्यिक उपक्रम निखळ,निर्पेक्ष हेतूने आयोजित करतात.

    शब्दसह्याद्री प्रतिष्ठान सेलूचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांच्या मार्गदर्शनात व सेलू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सेलू यांच्या सहकार्याने ह्या  नऊ वर्षांच्या नऊ पायऱ्या चढणे सहजशक्य झाले.

        या बहारदार काव्य मैफिलीत आजपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कवी,कवयित्रींनी हजेरी लावलेली आहे.ज्यामध्ये अभ्यासक्रमातील कवी शंकर कसबे,हनुमंत चांदगुडे,गीतकार डॉ. विनायक पवार, चित्रकार विष्णू थोरे,नारायण पुरी, अविनाश भारती, संजीवनी तडेगावकर, अण्णा जगताप, प्रा. कल्याण कदम,अमृत तेलंग, जितेंद्र लाड, श्रीनिवास म्हस्के, अलका तालनकर, अरविंद सगर,भाग्यश्री केसकर,रवींद्र केसकर, डॉ.मुकुंद राजपंखे, सारिका बकवाड, योगिराज माने,नामदेव कोळी, महेश देशमुख, राजेश रेवले,विठ्ठल चव्हाण,हरीष हातवटे, आत्माराम कुटे,जयश्री सोन्नेकर,शैलजा वसेकर,संतोष नारायणकर, शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, परभणीचे सचिव कवी केशव खटींग असे अनेक मान्यवर कवी 

' कविता मिरगाच्या ' या काव्य मैफलीत सहभागी झाले आहेत.

    शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे हे नववे वर्ष आहे.निर्पेक्षपणे चाललेल्या या साहित्य सोहळ्यास न चुकता मृगाच्या सरीही बरसत असतातच.या  सोहळ्यास रसिक श्रोत्यांनी नक्कीच उपस्थित रहावे.

यावर्षी ई टी.व्ही.  हास्यदरबारसह अनेक टी.व्ही.चॅनल गाजवणारे   कवी,विडंबनकार प्रभाकर साळेगावकर, समाधान इंगळे,संजय बोरूडे,आशा डांगे यांची बहारदार काव्य मैफिल आयोजित करण्यात आली आहे.     

       आयोजकांची कुठलीही लूडबुड नसलेला एखादा उत्तम कार्यक्रम कसा असू शकतो.याचे उत्तम उदाहरण पाहायचे असेल तर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे.

     एक साहित्यिक, शिक्षक,डॉक्टर, इंजिनियर,वकील, व्यावसायिक,राजकारणी म्हणून नाही.तर एक व्यक्ती म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी,सुसंस्कृत राजकारणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जाते त्या महाराष्ट्राच्या शिल्पकार, साहित्यिक यशवंतराव चव्हाण यांच्या सारखे सामान्य श्रोता म्हणून अशा साहित्यिक,सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने हजेरी लावली पाहिजे.

    'कविता मिरगाच्या' या कार्यक्रमातील आपली उपस्थिती स्वतः ला नक्कीच सर्वार्थाने समृद्ध करणारी असणार आहे .

      सात जूनची आतुरतेने वाट पाहणारे अनेक श्रोते सेलूत तयार झालेले आहेत.चला या साहित्य दिंडीत  सहभागी होऊन,या साहित्य पंढरीचे आपणही वारकरी होऊयात.

           

         शरद ठाकर

       ८२७५३३६६७५      

        सेलू जि.परभणी

1 टिप्पणी: